प्रतिनिधी / दहिवडी
जलसंधारणाची कामे झाली…पुरेसा पाऊसही झाला…पाणीसाठेही भरले…अन आटले सुद्धा.परिणामी गोंदवलेकरांवर आता पाणीटंचाईशी दोन करण्याची वेळ आलीय.कोरोना व पाणीटंचाई या दुहेरी संकटाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलली आहेत.
तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथे आंधळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता.मात्र दुष्काळात हा तलाव आटल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.त्यामुळे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी गोंदवल्यातील स्वमालकीच्या विहीरीतून पाणी उपलब्ध करून दिले होते.परंतु हे पाणीही पुरेसे नसल्याने ग्रामपंचायतीने गेल्या मे महिन्यात गावालगतच्या वाघमोडेवाडी पाझर तलावाजवळच्या विहिरीतून पाणी उपलब्ध केले होते.सध्या मात्र हा पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.परिणामी तलावालगतची विहीर देखील कोरडी पडली आहे.त्यामुळे येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.नेहमीच एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन-चार दिवसानी करण्यात येत आहे.
ही पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठय़ाच्या जुन्या विहिरींना सध्या पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने त्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. गावासाठी वेगळ्या तर कवटवस्तीसाठी वेगळ्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोंदवल्यात पाणीटंचाईचेही संकट सध्या उभे राहिल्याचे चित्र आहे.
गोंदवल्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पूर्वीप्रमाणेच आंधळी योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने हालचाली केल्या.मात्र त्यासाठीचा आर्थिक भार ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर असल्याने गावातील विहिरीतूनच तात्पुरता पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उरमोडी प्रकल्पातून पाणी सुटेपर्यंत गोंदवल्याला पाण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध करून देऊ.लोकांनी सहकार्य करावे.—संजय माने,उपसरपंच,गोंदवले बुद्रुक)