-पाण्याचा जादा वापर, जादा बील आकारणीचा परिणाम
विनोद सावंत/कोल्हापूर
`पाण्याचा जादा वापर, जादा बील’ या नवीन संकल्पनेमुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे 1 कोटींने उत्पन्न वाढले आहे. जादा पाणी वापरणाऱया 62 हजार 358 नळ कनेक्शनधारकांना वाढीव बिलाचा दणका बसला आहे. तर 40 हजार नळकनेक्शन धारकांचे बीलात कोणतीही वाढ झालेली नाही.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सात वर्षानी पाणीपट्टीत वाढ केली आहे. `जादा वापर करणार त्याला जादा बिल’ अशी नवीन दर आकरणीचे सुत्र आहे. एप्रिल 2021 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. दोन महिन्यामध्ये 20 हजार लिटरच्या आत पाणी वापरणाऱयांवर कोणतीही दर वाढ केलेली नाही. 20 हजार लिटरच्या वर पाण्याचा वापर करणाऱयांच्या दर आकरणीत मात्र, वाढ केली आहे. नवीन दरानुसार एप्रिल-मे 2021 मधील पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न 1 कोटींने वाढले आहे. 62 हजार नळकनेकश्न धारकांनी जादा पाण्याचा वापर केल्याने त्यांच्याकडून हे बील वसुल करण्यात आले आहे.
उत्पन्नात वाढ, पाणी बचतीला हातभार
नवीन आकरणीमुळे आता जादा पाणी वापरताना विचार करावा लागणार आहे. `पाणीपट्टीच्या उत्पन्नात वाढ आणि पाणी बचतीलाही हातभार’ असा दुहेरी उद्देश यामुळे साध्य झाला आहे.
प्रतिहजार लिटर दरवाढ
पहिला दर नवीन दर
निवासी वापर
0 ते 20 हजार लिटरपर्यंत 9.50 9.50
20001 ते 40 हजार लि. पर्यंत 11.50 12.65
40 हजार लि. पेक्षा जास्त 15 18
अनिवासी वापर
1 हजार लिटर 40 46
औद्योगिक वापर
1 हजार लिटर 65 74.75
एकूण नळ कनेक्शन -1 लाख 2 हजार 358
निवासी-99 हजार 449
व्यापारी -1616
औद्योगिक -1293
जुन्या दरानुसार दोन महिन्याचे जमा होणारे बील – 7 कोटी 50 लाख
नवीन दरानुसार जमा -8 कोटी 50 लाख
एक कोटींने उत्पन्न वाढले
पाणीपट्टीत वाढ करताना सामान्य नागरिकांना झळ पोहचू नये याची दक्षता घेतली आहे. जादा वापर करणाऱयांच्या बीलात वाढ केली आहे. एप्रिल 2021 पासून नवीन आकारणीला सुरवता झाली असून एप्रिल-मे या महिन्यांतील पाणीपट्टीतून 1 कोटींचे उत्पन्न वाढले. प्रशांत पंडत, पाणीपट्टी अधीक्षक, महापालिका