लक्ष्मीटेकडी येथे प्रशिक्षणास प्रारंभ : दोन दिवसांत सोपविणार पाणीपुरवठय़ाची जबाबदारी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणारे हंगामी कामगार संपावर गेल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने महापालिका आणि एल ऍण्ड टीने विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. याअंतर्गत 75 हून अधिक कामगारांची तात्पुरती नियुक्ती करून शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच येत्या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण भागात पाणीपुरवठय़ाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
शहरात पाणीपुरवठा कामगारांनी पाच दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. शासनाकडे पाठपुरावा करून देखील सेवेत कायमस्वरूपी केले नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर पाणीपुरवठा खात्याकडे 359 कामगार कार्यरत आहेत. सेवेत कायम करण्यासाठी अनेकवेळा निवेदने दिली. राज्य शासनाकडे पाठपुरावा केला तरीदेखील दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. मात्र दुसरीकडे शहरात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न चालविले आहेत. नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने निवृत्त व्हॉल्वमन आणि पंप ऑपरेटरांची मदत घेण्यात आली आहे. सध्या 20 निवृत्त कर्मचारी पंपहाऊस आणि जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र व्हॉल्वमन नसल्याने पाणीपुरवठा करणे अशक्मय बनले आहे. पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तात्पुरते व्हॉल्वमन नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आणि एल ऍण्ड टी कंपनीने घेतला आहे. त्यानुसार 75 हून अधिक हंगामी कामगारांची नियुक्ती करून शुक्रवारी सायंकाळी प्रशिक्षण देण्यात आले. लक्ष्मीटेकडी येथे व्हॉल्वमनना हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर व्हॉल्वमनना शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा वेळेत करण्याच्या दृष्टीने एल ऍण्ड टी कंपनीचे अभियंते पंपहाऊसवर कार्यरत झाले आहेत. शहरवासियांना पाणी समस्या भेडसावू नये, याकरिता विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.