16 हजार नव्हे फक्त 16 युनिटचे रू. 50 मोफत : नादुरूस्त मिटर सुधारणे, पाणीगळती थांबविणे मोठे आव्हान
प्रतिनिधी /फोंडा
गोमंतकीयांना आज 1 सप्टेबरपासून घरगुती वापरासाठी 16 हजार लिटर नळाद्वारे विनामुल्य पाणी, ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित होत आहे. परंतू वर्षभरापुर्वी झालेली पाणीपट्टीची वाढ लक्षात घेता या योजनेतून महिन्याकाठी फक्त रू. 50 ते 60 असा फायदा ग्राहकांना होणार आहे. योजना कशी असेल याची अधिसुचना पाणी विभागाच्या अभियंत्याकडे न पोचल्यामुळे नेमके लाभ किती जणांना होणार ही माहितीही स्पष्ट नाही. घरोघरी बंद पडलेल्या मिटरांचे काय? हेही स्पष्ट झालेले नाही.
गॅस, पेट्रोल, खाद्यतेल दरवाढीत होरपळलेल्या गोमंतकीयाना केवळ निवडणुकीचे गाजर म्हणून भाजपा सरकारने मोफत पाणी योजना जारी केल्याची काही संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या. सदर योजनेबद्दल अजूनही अनिश्चितता असून अंमलबजावणी होण्यापुर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे भरमसाठ बिले ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. कवळे फोंडा भागातील काही ग्राहकांना इन्स्पेक्शनच्या नावाखाली वर्षातून एकदा आकारण्यात येणारे शुल्क तब्पाल दोन-तीनवेळा आकारण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.
तसेच मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर येत्या 1 सप्टेबरपासून 16 घनमीटर युनिट पाणी वापरणाऱयांना ‘निल’ बिल येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र 16 युनिटच्यापलीकडे पाणी वापरासाठी बिल आकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारने पाणी विभागासाठी एप्रिल 2020 रोजी पाणी शुल्क आकारणी वाढविण्याचे ठरविले होते मात्र ग्राहकांचा वाढत्या विरोधामुळे सदर दरवाढीची अंमलबजावणी ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आली. त्यानुसार
घरगुती वापरासाठी जुना दर नवीन दर वाढ
0 ते 15 घनमिटर रू.2.50 प्रति घनमिटर रू. 3.50 1
16ते 25 घनमिटर रू. 5 प्रति घनमिटर रू. 9 4
26 ते 50 घनमिटर रू. 10 प्रति घनमिटर रू. 15 5
50 घनमिटरच्या वरती रू.15 प्रति घनमिटर रू.25 10
मिटर भाडे 15 मिमि. रू. 20 प्रति महिना रू. 50 30
मिटर भाडे 20 मिमि. रू. 70 प्रति महिना रू. 80 10
त्याशिवाय वर्षाकाठी एकदा मिटर सर्वेक्षणासाठी शुल्क आकारणी आलेली आहे.
काही ग्राहकांना मिटर सर्वेक्षणाच्या नावावर दोनदाही शुल्क आकारणी करण्यात आलेली आहे.
गोमंतकीयांना आधी स्वच्छ पिण्यायोग्य पाणी द्या-ऍड. वरद म्हार्दोळकर
गोमंतकीय पुर्वीपासून सुशेगाद म्हणून प्रसिद्ध आहेत. महिन्याकाठी केवळ पन्नास रूपयांसाठी गोमंतकीयाच्या माथ्यावर पाणी फुकट देत असल्याची बिरूदावली मिरवण्याचे काम डॉ. प्रमोद सावंत सरकार करीत आहे. निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी चालविलेला प्रचाराचा मुद्दा आहे. मागील काही दिवसापुर्वी उद्भवलेल्या नळाच्या पाण्य़ात आढळलेल्या प्लास्टीकसदृष्य पदार्थाबाबत आधी सविस्तर माहिती द्या. त्यावर आधी उपाययोजना करा. प्रथम पिण्यायोग्य स्वच्छ पाणी द्या असे कॉग्रेसचे युवा नेते ऍड वरद म्हार्दोळकर यांनी म्हटले आहे. दर दोन-तीन महिन्यानी पाठविणाऱया बिले प्रत्येक महिन्याला पाठवा ज्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला ताण पडणार नाही.
गाजावाज नको, फक्त 60 रूपयांचे पाणी फुकट-राजेश वेरेकर
फेंडय़ातील कॉग्रेसचे युवा नेते राजेश वेरेकर म्हणाले की भाजपा कार्यकाळात देश पुर्णता महंगाईच्या खाईत सापडलेला असून केवळ मतदारांना भुलविण्यासाठी हा घाट रचलेला आहे. फ्लॅट संस्कृतीतील ग्राहकांना याचा कोणता फायदा यावरही सरकारने स्पष्टता आणावी. एखाद्या इमारतीसाठी संग्रहित मिटर असून यांचा त्याना लाभ कसा ठरविण्यात यईल यावरही गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 16 हजार लिटर पाणी मोफत अशा हवेचा फुगा तयार केलेला आहे. गोमंतकीयासाठी फक्त 16 युनिट पाणी मोफत देणार असून त्याची किंमत रू. 50 ते 60 दरम्यान होत आहे. त्याऐवजी सर्वासाठी (24ƒ7) पाणी देण्यावर भर द्यावा.
मोफत पाणी स्वागतार्ह मात्र पाण्याविना तळमळू नका-ऍड. सुरेल तिळवे
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते ऍड. सुरेल तिळवे यांनी उशिरा का होईना सरकारला गोमंतकीयांसाठी मोफत पाणी देण्याची जाग आली हीच बाब स्वागतार्ह आहे. परंतू मुलभूत सुविधा सामान्य नागरिकांना मोफत आम आदमी पक्षाने दिल्लीत दिलेल्या आहेत. त्याचधतींवर गोव्यात मोफत वीजची घोषणा आम आदमी पक्षाने केल्यामुळेच भाजपा सरकारने मोफत पाणी योजना जाहीर केलेली आहे. ती अंमलात आणताना किमात दिवसेंदिवस सर्व कोपऱयातील गोमंतकीयांना पिण्यायोग्य पाणी देण्याचेही वचन द्यावे असे आव्हान ऍड. सुरेल तिळवे यांनी भाजपा सरकारला दिले आहे. निवडणूका सहा महिन्यावर येऊन ठेपल्यामुळेच ‘पॉलीटीकल जुमला’ करण्यात तरबेज असलेल्या भाजपा सरकारने या योजनेकडे पाहू नये. निवडणूकीनंतरही दरवाढ न करता सदर योजना सुरू ठेवावी.
पाण्याचा वापर कायदेशीररित्या करण्याचे पहिले पाऊल-अभियंता मापारी
दरम्यान यासंबंधी दाग फोंडा येथील पाणी विभागाचे सहाय्यक अभियंता मापारी यानी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वापरासाठी 16 हजार लिटर फुकट पाणीपुरवठा यासंबंधी सरकारने जारी केलेली अधिसुचना पोचलेली नसल्याचे सांगितले. तसेच जोपर्यत अधिसुचना जारी होत नाही तापर्यंत बंद पडलेल्या मिटरबाबत, फ्लॅट गाळे, सोसायटी यांना कोणता दर लावणार याबाबत स्पष्ट सांगण्यात नकार दिला. मिटर भाडे, मिटर सर्वेक्षण शुल्क तसेच 16 युनिटनंतर वापरण्यात येणाऱया पाण्यासाठी कीती दर आकारावा याबाबत अजून माहिती आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्पेक्शन ही प्रक्रिया ऑडीटनुसार करण्यात येत असून वर्षातून एकदा पाणी बिलावर पैसे आकारण्यात येत असतात. एखाद्या ग्राहकांच्या बिलावर एकपेक्षा जास्त वेळा इंन्स्पेक्शन चार्ज आकारण्यात आल्यास कार्यालयात दुरूस्ती करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.