प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सुमारे 90 ठिकाणी गळत्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या गळत्या काढण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर हे प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर आहेत. नारकर यांच्या विभागात ज्या अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून शेंडे हे सरसावले आहेत. त्याकरता त्यांनी सहा पथकांना सुचना दिल्या आहेत.
शहरात तब्बल 90 ठिकाणी छोटी मोठय़ा स्वरुपाच्या गळत्या लागलेल्या आहेत. त्या गळत्या काढण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सहा पथके नेमली आहेत. त्यामध्ये दोन नळकरी, चार बिगारी अशा सहा कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने बोगदा ते समर्थ मंदिर या मार्गावरील खाणीच्या मुख्य जलवाहिनीची मोठी गळती काढली. मंगळवार पेठ ते बोगदा या दरम्यानच्या जलवाहिनीचा जॉईंट दुरुस्त करण्यात आला.
तसेच गणेश टाकी, जेल टाकी, पॉवर हाऊस टाकी, राजवाडा टाकी, पोलीस लाईन टाकी, गणेश मेळवणे टाकी, घोरपडे टाकी, चार भिंती टाकी, कात्रेवाडा टाकी, बुधवार नाका टाकी आदी टाक्यांची जलवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीची कामे धडाक्यात सुरु आहेत. पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर हे रजेवर असल्याने त्यांच्या विभागाची सुत्रे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी घेतली आहेत.
कास आणि उरमाडी या उदभव योजनेतून दहा लाख दशलक्ष घनमीटर पाणी सातारकरांना दिले जाते. जुन्या पाईप, मोडकळीस आलेले जोड, पाण्याचा प्रचंड दाब, यामुळे सुमारे 20 ते 22 टक्के पाणी वाया जाते. यामुळे शहराच्या पश्चिम भागात विशेषतः बोगदा ते समर्थ मंदिर, राजवाडा या मार्गावर कमी दाबाने पाणी येत असल्याची काम समस्या आहे. समर्थ मंदिर ते शाहु चौक या दरम्यानही पाण्याची समस्या असते. त्यामुळे घंटेवारी करणाऱयांना लिकेजची माहिती कळवण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे. गळती काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. तीन दिवसात 35 गळत्या काढण्यात आल्या.
शाहुपूरी योजनेवर सीसीटीव्हीचा वॉच
सांबरवाडी जलशुध्दीकरण केंद्र व शहापूरी पाणी पुरवठा योजनेचे उपळी येथील उपसा केंद्र येथे सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. येथील कर्मचारी व पाणी उपसा तंत्रावर आता थेट पालिकेतूनच वॉच राहणार आहे. कधी डीपी जळणे, उपसा बंद पडणे, आदी बाबी सीसीटीव्हीमुळे लगेच लक्षात येणार आहेत. याचाही प्रस्ताव लवकरच काढण्यात येणार असून टाक्यांचेही अद्यावतीकरण होणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले.