प्रतिनिधी / पणजी
पाण्याची बिले भरण्यासाठी सरकारने एकरकमी तडजोड योजना ग्राहकांसाठी पुन्हा लागू केली असून तिची मुदतवाढ 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक पाणी ग्राहकांकडे (व्यक्ती- उद्योग- कंपन्या) मोठय़ा रकमेची बिले प्रलंबित असून त्यांच्यावरील ही योजना आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पावसकर यांनी दिली. या योजनेतून सुमारे रु. 70 कोटीची वसुली होण्याची अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे.
पत्रकार परिषदेत पावसकर म्हणाले की जानेवारी 2021 महिन्यासाठी ती योजना लागु केली होती. तथापि अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही व वसुली झाली नसल्याने सदर योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ज्यांची बिले प्रलंबित आहेत आणि ज्यांनी बिले भरली नाहीत तसेच 31 ऑक्टोबर 2020पर्यंत ज्यांची बिल प्रकरणे महसुल वसुली कोर्टात आहेत व ज्यांची पाणी जोडणी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत तोडण्यात आली त्या सर्वांना हि योजना लागु असून त्यांनी योजनेचा फायदा घेवून बिले भरावीत असे आवाहन पावसकर यांनी केले.
या योजनेअतंर्गत उशिरा बिले भरण्याचे शुल्क काही प्रमाणात- टक्केवारीने माफ करण्यात येणार असून या योजनेनंतरही दिलेल्या मुदतीत बिले भरण्यात आली नाही तर पाणी जोडणी तोडण्यात येणार असल्याचा इशारा पावसकर यांनी दिला.