प्रतिनिधी / चिपळूण
शहरातील सुमारे 80 हजार लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी काही वर्षांपूर्वीच सुमारे 16 कोटी रूपये खर्च करून नवी पाणी योजना साकारण्यात आली. मात्र तिच्या कामाच्या दर्जामुळे ती सुरूवातीपासून वादग्रस्त ठरली असून नगर परिषदेच्या पाणी विभागासमोर गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा डोंगर उभा रहात आहे. या समस्या सोडवण्याकडे विभागातील प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याने या योजनेवरील खर्च पाण्यात गेल्यासारखा असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पाणी योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत सुरूवातीपासून वादंग असले तरी सर्वांची जुळवाजुळव करीत योजनेचे बील पदरात पाडून घेण्यात ठेकेदाराला यश आले आहे. मात्र आता येणाऱया अडचणी लक्षात घेता ही योजना खरोखरच योग्य पध्दतीने झाली नाही, असे म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे. ही पाणीयोजना नवी असली तरी तिच्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागत आहे. तसेच भविष्याचा किंवा येणाऱया अडचणींचा कोणताही विचार न करता ती साकारण्यात आल्याने किरकोळ अडचणी आल्या तरी नागरिकांना अनेक दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गोवळकोट व खेर्डी येथे पंपहाऊस आहेत. तेथे जलशुध्दीकरण केंद्रही आहेत. तसेच ठिकठिकाणी साठवण टाक्या आहेत. पंपहाऊसमधून पाणी उचलून ते साठवण टाक्यांमध्ये आणून येथून त्याचा शहराला पुरवठा केला जातो. त्यामुळे या विभागात अधिकारी मिळून 18 कायमस्वरूपी व 50 ठेकेदारी कामगार आहेत. यातील काही कामगार पंपहाऊस, साठवण टाक्या येथे काम करतात. तर सुमारे 20 कर्मचारी नवीन कनेक्शन देणे, गळती काढणे अशी कामे करतात. मात्र बऱयाचदा हा विभाग नवीन कनेक्शन देण्यावर भर देत असून पाईपलाईनला असलेली गळती काढण्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. त्यामुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांनाही कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
दोन्ही पंपहाऊसच्या ठिकाणी जलशुध्दीकरण केंद्रे असली तरी शहराला अशुध्द पाण्याचा पुरवठा होतो, अशी ओरड कायम नगरसेवक प्रत्येक सभेत करताना दिसतात. येथील वाळू बदलली जात नसून अन्य दुरूस्त्या केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. मात्र अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात याचे कोडे मात्र आजही उलगडत नाही. तसेच पंपहाऊसमध्ये प्रत्येकी 2 पंप कायम चालू राहतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक राखीव पंप आहे. असे असताना हे राखीव पंपही दुरूस्त केले जात नसल्याने यातून या विभागाच्या कार्यतत्परतेची जाणीव होते. त्यामुळे हे दुर्लक्षही नागरिकांच्या सुरळीत पाणीपुरवठय़ात अडथळा ठरत आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता हा विभागाच विविध समस्यांच्या ‘पाण्यात’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिकाऱयांना योजनेची माहितीच नाही
सध्या पाणी विभागात नवीन अधिकारी आहेत. त्यामुळे पाणी योजना साकारताना कोठे काय पध्दत आहे, याची त्यांना माहितीच नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करताना गोंधळ उडू नये म्हणून निवृत्त अधिकाऱयांना नाईलाजास्तव ठेकेदारी पध्दतीने कामावर घ्यावे लागत आहे. मात्र हे अधिकारी नव्यांना पाणीयोजनेविषयी काही सांगत नाही आणि ते त्यांच्याकडून समजून घेत नाहीत. त्यामुळे हा गोंधळ कायमच राहणार असल्याचे दिसून येत आहे.
पंपाची क्षमता कमी :पेठे
या बाबत बोलताना पाणी विभागाचे अभियंता नागेश पेठे म्हणाले की, काही पंप हे उच्च दर्जाबरोबरच चांगल्या क्षमतेचे आहेत. त्यामुळे त्यात तितकासा बिघाड होत नाही. मात्र ज्यांची क्षमता व दर्जा तितकासा चांगला नाही, त्या पंपामुळे अडचणी येत आहेत. मात्र अडचणी आल्यावर वरीष्ठ व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या तत्काळ सोडवून नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे सागितले.