आपच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीचे काम 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र अजून 50 टक्के कामही पूर्ण झाले नाही. महापालिकेची निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी अजून महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली गेली नाही. पाण्याची समस्या शहरात गंभीर बनली आहे. या समस्या सोडविण्यासाठी व इतर मागण्यांसाठी आपतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
शहरातील जनता गेल्या महिन्याभरापासून पाण्यासाठी वणवण भटकत आहे. या समस्येमुळे महिलावर्ग तणावाखाली आहे. ही समस्या तातडीने सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही. महापौर-उपमहापौर नाही. त्यामुळे शहराच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा तातडीने ही निवडणूक घ्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
स्मार्ट सिटीचे काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी तातडीने महापौर-उपमहापौर निवडणूक घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिस सौदागर, रिजवान मकानदार, इम्रान सय्यद, नूमन खानापुरी, महावीर अनगोळ, अब्दुल तवाफ, शंकर हेगडे, बसीरअहम्मद जमादार, साहील नदाफ व कार्यकर्ते उपस्थित होते.