संबंधित कंपनीसह महापालिकेला सूचना केल्याची दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीपुरवठय़ाबाबत समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत तुम्ही काय करणार? असा प्रश्न पत्रकारांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना विचारला असता संबंधित कंपनीला आणि महापालिकेला सूचना केली आहे, असे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. त्याबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत हे सांगितले तर प्रत्यक्षात सुधारणा होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऐन उन्हाळय़ातच शहरवासियांना पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. एलऍण्डटी कंपनीच्या या कारभाराबद्दल पूर्वीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राकसकोप तसेच हिडकल जलाशयामध्ये मुबलक पाणीपुरवठा असताना त्याचा योग्यप्रकारे पुरवठा केला जात नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार काय? असा प्रश्न देखील जनतेतून उपस्थित होत आहे. बेळगाव शहराला वालीच कोणी नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. अधिकाऱयांवर कोणाचेच वचक नाही. जिल्हाधिकारी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. वारंवार हिंडलगा पंपहाऊसमध्ये बिघाड होत चालला आहे. हेच कारण एलऍण्डटी कंपनीचे अधिकारी देत आहेत. मध्यंतरी कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता. त्यानंतर पुन्हा आता हा त्रास सुरू झाला आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱयांनी संबंधित कंपनीला आणि महापालिकेला सूचना केल्याचे सांगितले तरी शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल का?, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.