कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे मत : कृष्णा नदीकाठची पाहणी : केंद्रीय जल आयोगाची तत्त्वे धुळीस
उत्तम काटकर /एकसंबा
प्रत्येक वषी कृष्णा खोऱयात होणाऱया मुसळधार पावसामुळे धरणामधून होणारा पाण्याचा विसर्ग व आलमट्टी धरणामुळे होणारा पाण्याचा फुगवटा ही महापुरास कारणीभूत असणारी प्रत्येक वषीची कारणे आहेत. पण 2021 साली आलेल्या महापुराने बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱयांमध्ये समन्वयाचा अभाव तर आहेच शिवाय महापुरास धरणांमध्ये लवकर पाणी साठवणुकीचा हव्यास प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मत सांगली येथील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने व्यक्त केले आहे.
गुरुवारी 21 रोजी सकाळी मिरज येथील निवृत्त साहायक आरेखक सुकुमार पाटील, निवृत्त उपअभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव पाटील या कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱयासह चिकोडी तालुक्मयातील मांजरी पूल व हिप्परगी धरणाची पाहणी केली. दरम्यान, मांजरी पुलाचा पाहणी अभ्यास करताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच या भागातील महापुराची कारणेही त्यांनी जाणून घेतली.
प्रत्येक वषीच्या पावसाळय़ात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कृष्णा काठावरील भागाला पूरस्थितीचा सामना करावा लागतो. महापूर येण्यास मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर नद्यांच्या पात्रांमध्ये अवैज्ञानिकरित्या बंधारे व पुलांच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत असलेला भराव महापुरासह कारणीभूत ठरत आहे. परिणामी याचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या शेतीला बसत आहे. कृष्णा नदीकाठच्या शेतीचा विचार करता मोठय़ा प्रमाणात माती वाहून गेली आहे. शेतकऱयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पूल किंवा बंधारे बांधताना अधिक भराव टाकण्याऐवजी पुलांना जास्तीत जास्त प्रमाणात कमानी केल्यास महापूर नियंत्रणात येण्यास थोडीफार मदत होऊ शकते.
कृष्णा नदीच्या उगमस्थानापासून ते आलमट्टी जलाशयापर्यंत जवळपास कृष्णा नदीच्या पात्रात 35 नद्यांचा संगम झालेला आहे. या सर्व नद्यांचे पाणी कृष्णा आपल्या पात्रातून वाहून नेत असते. कोयना धरण ते राजापूर बंधाऱयापर्यंत कृष्णा नदीचा उतार हा चांगला आहे. तर राजापूर बंधाऱयापासून ते आलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीचा उतार हा खूपच कमी आहे. याबाबत सविस्तर आकडेवारी पाहता कोयना धरण ते कराडपर्यंत कोयना नदीचा उतार 1 कि. मी. अंतरामागे 88 से. मी इतका आहे. कराड ते सांगली कृष्णा नदीचा उतार 1 कि. मी. अंतरामागे 46 से. मी इतका आहे. सांगली ते राजापूर बंधाऱयापर्यंत 1 कि. मी. अंतरामागे 43 से. मी. इतका उतार आहे.
पुलांसाठी टाकलेला भराव कारणीभूत
राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्यातील शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱयापुढे कृष्णा कर्नाटकात प्रवेश करते. तर राजापूर बंधाऱयापासून ते आलमट्टी धरणापर्यंत 1 कि. मी. अंतरामागे केवळ 12 से. मी. इतका उतार आहे. कोयना धरणापासून ते राजापूर बंधाऱयापर्यंत नदीचा उतार हा खूप आहे. यामुळे पाणी वेगाने पुढे सरकते. तेच राजापूर बंधारा ते आलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीचा उतार हा खूपच कमी आहे. यामुळे सदर भागातील पाणी पुढे जाण्याची गती मंदावते. याचाही परिणाम पूरजन्यस्थिती निर्माण होण्यास होत आहे. उतार कमी असण्याबरोबरच ठिकठिकाणी बंधारे व पुलांसाठी टाकण्यात आलेला भराव आणखीनच पाणी फुगवटय़ास कारणीभूत ठरत आहे.
कोल्हापूर व सांगलीत येणाऱया महापुरास आलमट्टी धरण जबाबदार असल्याचे बोलले जात होते. यामुळे दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱयांमध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेतून समन्वय रहावा यासाठी महापुरादरम्यान आलमट्टी धरणाची पाणीपातळी 516 मीटरपर्यंत ठेवण्याबाबत निर्णय झाला. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केंव्हाच झाली नाही. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या मते आलमट्टीची पाणीपातळी 516 मीटर होते. तेव्हा कोल्हापूर भागातील पाणी 8 तासानंतर उतरण्यास सुरुवात होते. तर सांगलीचे पाणी ओसरण्यास 16 तासांचा कालावधी लागतो.
2021 जुलै महिन्यात आलेल्या महापुरादरम्यान आलमट्टीची पाणीपातळी वाढत गेली आणि महापुराचा विळखा बसला. 23 ते 30 जुलै पर्यंत महापूर होता. या 8 दिवसाच्या काळात दोन दिवस वगळता आलमट्टीची पाणीपातळी 516 मीटरच्या वरच होती. यावरुन स्पष्ट दिसते की पाणी साठवणुकीमुळे कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागले.
केंद्रीय जल आयोगाची तत्वे
केंद्रीय जल आयोगाने कृष्णा खोऱयातील धरणांमध्ये केंव्हा व किती पाणी साठवावे याबाबत आराखडा तयार केला आहे. यावरून कृष्णा खोऱयातील धरणाच्या पाणी साठवण क्षमतेच्या 10 टक्के इतके पाणी 31 मे पर्यंत असणे आवश्यक आहे.
उपाययोजना करण्याचा प्रयत्न
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने पाहणी दौऱयादरम्यान नद्यांच्या पात्रात वाढलेला मानवी हस्तक्षेप, पुलांचा भराव, अधिकाऱयांमध्ये समन्वयाचा अभाव ही प्रमुख कारणे महापुरास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून पुराविषयी मते जाणून घेतली जात आहेत. पुढील काळात महाराष्ट्र व कर्नाटक शासनाला सदरचा अहवाल पाठवून योग्य ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.