पाण्याचा अपव्यय टाळणे काळाची गरज : होळीनिमित्त जाणूनबुजून पाण्याची नाहक नासाडी केल्याने नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
नुकताच होळीचा सण झाला. दुसऱयाच दिवशी धूळवड झाली. शहरासह काही उपनगरांमध्ये रंगपंचमी अत्यंत उत्साहात पार पडली. दोन वर्षे कोरोनामुळे हा सण साजरा करता आला नाही. त्यामुळे यावषी अलोट गर्दी उसळली. तरुण, तरुणी बेभाम होऊन नाचत होते. मात्र, हे करत असताना अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होताना दिसला. एरवी पाणी बचाव असा नारा देणाऱयांनी यावेळी मात्र पाण्याबाबत चकार शब्दही काढला नाही. सण आहे तो साजरा केलाच पाहिजे. मात्र, पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी प्रत्येकानेच काळजी घेणे काळाची गरज आहे. थेंब थेंब वाचविण्यासाठी सरकारपातळीवरच जनजागृती केली जाते. मात्र, काही ठिकाणी जाणूनबुजून नाहक पाण्याची नासाडी करण्यात आली. यामुळे काहीशी नाराजी व्यक्त होत आहे.
पाणी हे सर्वस्व आहे. पाण्याशिवाय आपला एक क्षण जात नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्या दैनंदिन उपक्रमात पाण्याची गरज लागतेच. पाणी ही मौल्यवान वस्तू आहे. याची जाण ठेऊन आणि भविष्यासाठी पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. यावषी पाणीटंचाई नाही हे आमचे सुदैव आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर येऊन मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हय़ातील जलाशये तुडुंब भरली होती. त्यामुळे यावषी पाणीटंचाई भासणार नाही, हे जरी खरे असले तरी भविष्याच्यादृष्टीने प्रत्येकानेच विचार करणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱयांकडूनही पाण्याची नासाडी
दैनंदिन जीवनात बेहिशेबी पाणी उपसून ते वाया घालविण्यात अर्थ नाही. शिवारातदेखील शेतकरी पाणी पाजताना बऱयाच वेळा रात्री विद्युत मोटार सुरू करायची आणि सकाळीच शेताकडे जायचे, असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे पाणी वाया जात आहे. याबद्दल खुद्द काही शेतकऱयांनीच नाराजी व्यक्त केली होती. पिके पिकविण्यासाठी पाण्याची गरजही लागणार, मात्र पिके घेताना जेवढे पाणी लागेल तेवढाच त्याचा वापर झाला पाहिजे. बऱयाच वेळा पिकाऐवजी इतरत्रच पाण्याचा लोंढा जातो आणि ते संपूर्ण पाणी वाया जाते. यातच बऱयाच वेळी थ्रीफेजची समस्यादेखील त्याला कारणीभूत ठरत आहे. रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीज दिली जाते. त्यामुळे शेतकऱयाला रात्रभर शिवारात थांबावे लागते. त्यामुळे कंटाळून काही शेतकरी घरी येतात. त्याच काळात हे पाणी वाया जाते.
खबरदारी घेणे महत्त्वाचे
सध्या स्वच्छतेवर भर द्या, असे आवाहन वारंवार केले जाते. शौचालयांमध्येही वेगवेगळे प्रकार आता येत आहेत. पाश्चात्य देशातील नवीन प्रकारच्या शौचालयांमध्ये सुविधा उपलब्ध होताना त्यासाठी पाण्याचा वापर मात्र मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. एरवी चार-पाच लीटर लागणारे पाणी आता 10 लीटरपेक्षा अधिक झाले आहे. एकदा शौचालयाला जाणाऱया व्यक्तीला 10 लीटर पाणी वाया गेले तर हादेखील पाण्याचा अपव्यय असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छता हवीच, मात्र त्यासाठी पाणी वाया जावू नये याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या होळी सणाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. काही जण म्हणतील आम्ही वर्षातून एकदाच हा सण साजरा करतो. त्यामुळे पाणी वाया गेले तर काय झाले? मात्र आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी पुढील पिढीसाठी आतापासूनच बचत होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे काय होईल, याचा अंदाज करणेदेखील कठीण जाणार आहे. अनेकांनी पाण्यासाठीच युद्ध होणार, अशी भविष्यवाणी केली आहे, ते काही खोटे नाही. कारण अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यांना त्या पाण्याची किंमत समजून येते. जिल्हय़ातीलच अनेक भागांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असते. त्यामुळे त्यांना 3 ते 4 किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. त्यांनाच पाणी म्हणजे काय? हे समजते.
पाण्याचा वापर हा केलाच पाहिजे. परंतु सतत किंवा नाहक पाण्याचा वापर टाळला पाहिजे. वारंवार वाहने धुणे, नळ बंद न करणे, घरासमोर पाण्याचा दोन ते तीन वेळा फवारा मारणे असे प्रकार टाळले पाहिजेत.