प्रतिनिधी /वास्को
शे दोनशे रूपयांच्या जागी हजारो रूपयांची आलेली पाण्याची बिले भरायची कशी असा प्रश्न गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना पडलेला आहे. अद्याप तरी सरकारने हा प्रश्न गांभिर्याने घेतलेला नाही. वास्कोतील पाणी पुरवठा विभागात काल सोमवारी पुन्हा एकदा या प्रश्नावर गदारोळ निर्माण झाला. या विभागाच्या स्थानिक अधिकाऱयांना नागरिकांनी पुन्हा धारेवर धरले.
दाबोळी व कुठ्ठाळी भागातील लोक काही दिवसांपूर्वी वास्को बायणातील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जमा होऊन वाढीव बिलाच्या प्रश्नावर अभियंत्याना जाब विचारला होता. त्यावेळी या प्रश्नावर वरीष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी लोकांना दिले होते. काल सोमवारी पुन्हा त्याच लोकांनी पाणी पुरवठा कार्यालयात जमा होऊन सहाय्यक अभियते नरेश पैंगिणकर यांना पाण्याच्या वाढीव बिलांसंबंधी खुलासा करण्याची मागणी केली. या प्रश्नावर प्रत्येकाने अर्ज करावेत. त्यानंतर चौकशी होईल असे सांगण्याचा प्रयत्न या अधिकाऱयांनी केला. मात्र, नागरिकांचे या उत्तराने समाधान झाले नाही. ते शक्यच नसल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. या प्रश्नावर बराच वेळ गदारोळ निर्माण झाला. सर्वप्रथम वाढीव पाणी दरासंबंधी सरकारने कुणालाही विश्वासत घेतलेले नाही. कसलीच कल्पना दिलेली नाही. मोफत पाणी दिले जाईल असे आश्वासन देऊन सरकारने चक्क फसवले आहे असा आरोप यावेळी लोकांनी केला. जुन्या दरानेच पाण्याची बिले द्यावीत अशी मागणी त्यांनी केली. वाढीव बिलांमुळे नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्यासंबंधीची माहिती आपण सरकारपर्यंत पोहोचवू असे आश्वासनही यावेळी अधिकाऱयांनी लोकांना दिले.
मात्र, सध्या लोकांना शे दीडशे रूपयांच्या जागी दोन हजार रूपयांपर्यंत बिले आलेले असून पाण्याचे बिले अनेकपटीने वाढल्याने लोकांना हजारो रूपयांची बिले आलेली आहेत. लोकांनी याचा धसका घेतलेला आहे. ही बिले आता कशी भरावीत असा प्रश्न गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सतावू लागलेला आहे. आतापर्यंत ज्या ज्या कुटुंबांना पाण्याची बिले आलेली आहेत, त्यांना पाण्याची बिले पाहून धक्का बसलेला असून लोकांच्या संतापाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही.