वागातोर येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन, सहा तास रास्तारोको, सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी
वार्ताहर /शिवोली
वागातोर कायसुव तसेच शापोरा येथील ग्रामस्थांनी या भागात होणाऱया अपुऱया पाणीपुरवठय़ाप्रश्नी बुधवारी सकाळपासून मँगो ट्री ते किनाऱयाकडे जाणाऱया रस्त्यावर ठिय्या मांडून रास्तारोको आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदारांच्या विरोधात घोषणा देऊन मोफत पाण्याऐवजी सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात स्थानिक महिलांसह सरपंच सावियो आल्मेदा, पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, शीतल दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाईक, गजानन तिळवे तसेच अमोल गोवेकर, राजेंद्र शिरोडकर, ब्रॅन्डा लोबो, मायकल मेन्डोसो, मातिल्दा सिक्वेरा, सिद्धेश कळंगूटकर, सरीता गोम्स, सावियो आल्मेदा, तुकाराम कोरगावकर, कल्पेश दाभोलकर यांनी भाग घेतला.
गेल्या अनेक वर्षापासून शापोरा, हणजुण व वागातोर या भागात पाण्याची तीव्र समस्या आहे. या संदर्भात अनेकवेळा निवेदन सरकारी यंत्रणेला देऊनही अपुऱया पाणीपुरवठय़ाकडे दुर्लक्ष झाल्याचे या ठिय्या आंदोलनातून दिसून आले. भाजप सरकारने दर महिन्याला अंदाजे 16 घनलिटर पाणी मोफत देण्यात येईल, अशी घोषणा केली होती, पण ती योजना फोल ठरल्याची येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून दाखविली.
कोविड महामारीत लोकांनी अनेक हाल काढले. लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यातून नुकतेच लोक सावरत आहेत. या भागात पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीत पाणी टंचाई होणे म्हणजे आमच्या मिळकतीवर घाला आहे. मोफत पाण्या ऐवजी किमान विकत तरी सुरळीत पाणी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सहा तास रास्तारोको
आंदोलकांनी पाणी द्या, अशी मागणी करीत सहा तास रास्ता रोको केला. वागातोर येथे मुख्य जंक्शनवर आंदोलक खुर्च्या व घागर घेऊन बसले होते. पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलकांची गर्दी पाहून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच साहाय्यक अभियंत्यांनी हजर राहून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठाण मांडून बसू असा जोर धरला.
न दिसणारे लोकप्रतिनिधी अचानक हजर
वागातोर, हणजुण व कायसुव भागातील नागरिकांना अनेक वर्षापासून पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. लोकांनी सरकारी कार्यालयांवर व प्रसिद्धी माध्यमातून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी या भागातील लोकप्रतिनिधी कुठेच दिसून आले नाहीत ते अचानक आज प्रकट झाले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
वॉल्व ऑपरेटरांचे फोन बंद
या भागात प्रकाश नामक कर्मचारी वॉल्व ऑपरेटर म्हणून काम पाहतो. तो कामावर हजर असतो की नाही याबाब्त काही कळत नाही. त्याला फोन करून काहीच उपयोग होत नाही. त्याचा फोन नेहमीच बंद असतो, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दोन दिवसांच्या मुदतीची अधिकाऱयांची विनवणी
नागरिकांचे आंदोलन तीव्र होत असल्याचे दिसताच अधिकाऱयांनी त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली. मात्र नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळांनी याच अधिकाऱयांनी नागरिकांची मनधरणी करून दोन दिवसांची मुदत मागितली.
आमदार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी एकत्र येऊन रस्ता रोको करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार विनोद पालयेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.