मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाची मालिकाच सुरू आहे. राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. दरम्यान यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली असून त्याला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचं काय झालं? असा सवाल केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या टीकेनंतर लागेचच पडळकर यांनी ट्विट करुन उत्तर दिले. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली.
गोपीचंद पडळकर यांच्या या ट्वीटला बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनीदेखील ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, अशी टीका त्यांनी केली आहे.