महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांची माहिती.
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासनाने 12 फेब्रुवारी 2021 रोजी तपासणी करून पात्र शाळांची यादी प्रसिद्ध केली. 20 टक्के व 40 टक्के अनुदान देण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र या यादीतील सर्व शाळा 13 सप्टेंबर 2019 लाच पात्र झाल्या आहेत. सध्या केलेल्या तपासणीत पुर्वी 100 टक्के अनुदानास पात्र शाळा अपात्र केल्या आहेत. त्यामुळे शासनाने विनाअनुदानित शाळांची फसवणूक केल्याचे सिध्द झाले आहे, अशी माहिती पत्रकाव्दारे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे, विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन थांबवण्यासाठी शाळा तपासणीचे नाटक शासनाने केले. त्यातही फसवूक करून शिक्षकांच्या भावना दुखावल्या आहेत. सप्टेंबर 2016 पासून 20 टक्के अनुदान घेणार्या शाळा, 1 व 2 जुलै रोजी अनुदानास पात्र ठरून अनुदान घेत असलेल्या शाळांची गरज नसताना तपासणी केली. जाणून-बुजून यातील जवळजवळ 30 ते 40 टक्के शाळा अपात्र ठरवल्या आहेत. गेली 20 ते 22 वर्षांपासून अनुदान मिळावे, यासाठी विनाअनुदानित शिक्षक रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे. राज्य सरकारमधील बर्याच मंत्र्यांनी निवडणुकीच्यावेळी आश्वासनाचे गाजर दाखवले. सत्तेवर आल्यानंतर मात्र दिलेले आश्वासन विसरून गेले. सत्ताधार्यांच्या भोंगळ कारभारामुळेच विनाअनुदानित शिक्षकांचे भविष्य अंधारात आहे. राज्य सरकारने विनाअनुदानित शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे थांबवावे अन्यथा विपरीत परिणाम होतील.
राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार मूग गिळून गप्प का ?
शासनाने फेब्रुवारीत काढलेला अद्यादेश फसवा असल्याने तो रद्द करून 13 सप्टेंबर 2019 च्या निर्णयाने पात्र सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार, अनुदान देण्याचा आदेश काढावा. अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात. पटसंख्ये अभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार.
– खंडेराव जगदाळे (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती)
सर्व शिक्षक आमदारांनी आझाद मैदानात बसावे
गेल्या 20 दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानात सुरू आहे. आमच्या मतावर निवडून आलेल्या राज्यातील सर्व शिक्षक आमदारांनी आमच्यासोबत आझाद मैदानात बसावे, अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात शिक्षक आमदारांच्याबद्दल असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा ईशारा आंदोलकांनी दिला.