आत्महत्या की घातपात..?
प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावाच्या शिवारातील शेततळ्यात आई आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी चारच्या सुमारास उघडकीस आली. पाथरी-बेलाटी रस्त्यावरील शेतात ही घटना घडली. आनंदी कुटुंब म्हणून परिसरात ओळख असलेल्या कुटुंबातील दोन मुली आणि आईच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पाणी पिण्यासाठी मुलींना घेऊन आई शेततळ्यात का उतरली? तसेच घरातून शेताकडे निघालेल्या तिघांना काही वेळातच पाणी पिण्याची इच्छा कशी झाली याबाबत गावपरिसरात तर्कवितर्क काढले जात आहेत. आत्महत्या की घातपात याबाबतचा खुलासा झाला नसला तरी तिघींच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे.
सारिका आकाश ढेकळे (वय 20), गौरी आकाश ढेकळे (वय चार) व आरोही आकाश ढेकळे (वय दीड वर्ष, सर्व रा. पाथरी, ता. उ. सोलापूर) अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. आकाश ढेकळे याची पाथरी परिसरात पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे. अशोक गुंड यांच्या शेताशेजारी आकाशचे शेत आहे. यामध्ये त्याने द्राक्षाचे पीक घेतले आहे. ढेकळे कुटुंबातील सारिका ही दररोज पाखरं हाकलण्यासाठी दुपारनंतर मुलींना शेतात घेऊन जात होती, अशी माहिती गावकऱयांनी दिली. नेहमीप्रमाणेच शुक्रवारी दुपारीही सारिका गौरी आणि आरोहीला सोबत घेऊन शेताकडे निघाली परंतु ती शेतात पोचलीच नाही.
शेततळ्यावरील मोटार सुरू करण्यासाठी अशोक गुंड चारच्या सुमारास शेततळ्याकडे गेले त्यावेळी त्यांच्या नजरेस जे दृश्य दिसले त्याने त्यांना काही सुचेनासा झाले. ते शेततळ्यातील भयानक दृश्य पाहून मोठय़ाने ओरडले. त्यांच्या आवाजाने परिसरातील शेतकऱयांनी तिकडे धाव घेतली. चार वर्षांची आरोही पाण्यावर तरंगत होती तर सारिका आणि गौरी तळ्याच्या तळात दिसून येत होत्या. जमलेल्या शेतकऱयांनी क्षणाचाही विलंब न करता आरोहीला बाहेर काढले. पाठोपाठ सारिका आणि गौरीला पाण्याबाहेर काढले. दरम्यान, तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक हिमत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच माहिती घेतली. सारिका, गौरी आणि आरोही यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्या तिघी मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
6 जानेवारी रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावाच्या शिवारातील शेततळ्यात तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुसरी घटना घडली आहे. तालुक्यात शेततळ्यात बुडून मृत्यूच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.