सुधाकर काशीद / कोल्हापूर
धनाजी थोरात यांचे पन्हाळा रस्त्यावर वाघबिळाजवळ पानपट्टीच दुकान पानाबरोबरच इतर खाद्यपदार्थ, शितपेये यामुळे दुकान भरगच्च दिसणारे. वर्दळीचा मार्ग असल्याने दुकान रात्री अकरापर्यंत सुरू. पण धनाजी त्यावर समाधानी राहिला नाही. त्याने ठरवले पानाचा व्यवसाय करता करता आपल्या शेतीचाही विकास करायचा आणि या पठठ्याने आपले आपले पानपट्टीचे दुकान तर व्यवस्थित चालू ठेवलेच. पण आपल्या खडकाळ शेतीचा चेहरा मोहराच बदलला. आंबा, फणस, काजू, पेरू, नारळ याची झाडे तर लावलीच पण चक्क सफरचंदाची ६५ झाडे लावली.
आता त्याने या आपल्या शेतात सफरचंद पिकवण्याचा निर्धार केला आहे. लहान मुलाला जपतात तसे तो या सफरचंदाच्या ६५ झाडांना जपतो आहे. वाघबिळात सफरचंद रूजेल तो दिवस त्याच्या दृष्टीने खूप मोलाचा असणार आहे. एक साधा पानपट्टीवाला किती मोठा निर्धार करू शकतो आणि त्या दृष्टीने पाऊल टाकायला लागतो याचे हे उदाहरण वाघबिळाजवळ बांबरवाडीच्या हद्दीत धनाजीचे पानपट्टी, शितपेयाचे दुकान आहे. त्यांच्या वाट्याला दोन एकर शेती आली पण ती सारी खडकाळ. त्यामुळे धनाजी व त्याचे वडील तानाजी यांनी तलावातला गाळ, छोटा बंधारा, शेततळी या माध्यमातून आपल्या शेतीचा चेहरा मोहरा बदलला. त्यासाठी पानपट्टीच्या दुकानाव्दारे मिळणाऱ्या पैशाचा आधार उपयोगी ठरला.
एकीकडे पानपट्टी व दुसरीकडे शेती यावर त्याने भर दिला. आज त्याच्या शेतात आंब्याची पाच प्रकारची ८४ झाडे आहेत. याशिवय एक एकरात ऊस आहे. बाजूला पेरू, सिताफळ, फणस, काजू, शेवगा, पपई, नारळ, रामफळ, याची झाडे आहेत. आणि आता त्याने चक्क सफरचंदाची ६५ झाडे लावली आहेत. वाघबिळातील शेतात सफरचंदाची झाडे म्हटल्यावर या क्षणी त्याला बहुतेकांनी वेड्यात काढले आहे. पण त्याच्या मते 18 महिन्यांनी वाघबिळात सफरचंदाने लगडलेले झाड दिसणार आहे. त्यामुळेच त्याने सफरचंदाच्या आणखी 200 रोपांची ऑर्डरही दिली आहे.
धनाजीच्या मते या साऱ्या प्रयत्नाला आर्थिक बळ पानपट्टीच्या दुकानामुळे मिळाले. त्यामुळे आजही तो पानपट्टीचा व्यवसाय चालवतो. पानपट्टीबरोबरच शितपेयेही विकतो. रस्ता भरपूर वाहतुकीचा असल्याने त्याचा व्यवसाय बऱ्यापैकी चालतो. त्यामुळे त्याला आपल्या पानपट्टी व्यवसायाचा अभिमान आहे. या पानपट्टीच्या आधारावर तो आपली शेती आणखी फुलवणार आहे.