आग्नेल फर्नांडिस यांची मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
विधानसभेतील दोन आमदारांनी सरकारातील एका मंत्र्याला ‘पाल्बो एस्कोबार’ संबोधित करून गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी तसेच एनसीबी, अंमलबजावणी संचालनालया(ईडी)मार्फत त्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली. ड्रग्सच्या व्यवसायातून सदर मंत्री सरकारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास गोव्याची वाईट अवस्था होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा फर्नांडिस यांनी कळंगूट येथे दिला.
यावेळी माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, कळंगूट काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी भाजप सरकारात मंत्री असताना असेच आरोप केले होते. तर आता अआमदार विनोद पेलयेकर यांनी निशाणा साधला आहे. भाजपातील पाब्लो एस्कोबार वर किनारी भागात अंमलीपदार्थ व्यवसायाचा आरोप दोघांकडूनही होत असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. असे फर्नांडिस म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस तसेच लोकांची फसवणूक करणाऱया गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती करू नये हे आपले वैयक्तिक मत आहे. आज त्यांचे तीन आमदार आहेत. पुढील निवडणुकीत अधिक जागा मागतील. ते काँग्रेससोबत राहतील याची शाश्वती नाही. युती करून काँग्रेसला त्याचा लाभ होणार नाही असे आग्नेल फर्नांडिस म्हणाले.
दरम्यान कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यास मतदार काँग्रेसला धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला. नेत्यांना केवळ पैशांसाठी लोबो पक्षात घ्यायचे आहे का? ड्रग्सच्या पैशातून पक्ष चालवायचा आहे व असे प्रश्न उपस्थित करून फर्नांडिस यांनी लोबो यांच्या काँग्रेस प्रवेशास तीव्र आक्षेप घेतला.
कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, ड्रग्समुळे कळंगूट भागात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्स व्यवसाय वाढल्यानेच हे प्रकार घडत असून त्याला मायकल लोबो हेच कारणीभूत आहेत. ड्रग्स व्यवहारात पोलीस गुंतल्याचा आरोप लोबो यांनी केला होता कारण त्यांना पोलिसांनाच ब्लॅकमेल करायचे होते. लोबो गोव्याबाहेर असताना सर्वात मोठा छापा टाकण्यात आला. तसेच पूर्वी एकमेकांवर आरोप करणारे खंवटेच लोबो यांना कोणीतरी एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
माजी सरपंच जोसफीन सिक्वेरा म्हणाले की, राज्यात जोपर्यंत भाजपा सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत ड्रग्सचा व्यवसाय बंद होऊ शकत नाही. लोबो यांनी दिलेल्या पैशावर भाजपा पक्ष चालवत आहे. आणि किनाऱयावर सर्व बेकायदेशीर व्यवसा बिनबोभाटपणे सुरू आहेत असे ते म्हणाले.