● दुसऱ्या संतोष पोळचा अलिखित फतवा
● आणखी दोन मिसींगबाबत नितीनची चौकशी
विशेष प्रतिनिधी “तरुण भारत”
भुईंज, सातारा
खून करताना करणाऱ्याची मानसिकता महत्वपूर्ण असते. संतोष पोळने केलेले खून आजही अनाकलनीय असले तरी पाच वर्षानंतर तयार झालेल्या नव्या क्रूरकर्मा नितीन गोळे याची मोडसऑपरेंडी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर ‘तरुण भारत’ टीमला हे जाणवले की त्याचा एकच नियम आहे की, ‘पाय घसरला की खेळ खल्लास’. दोन्ही खूनांच्या मागे हेच कारण असून वाई तालुक्यातील अन्य दोन ‘मिसींग केस’शी नितीनचा संबंध शोधण्यात तपास अधिकारी आशिष कांबळे आणि त्यांच्या टीमने जोर लावला आहे. मात्र बायकोसह प्रेयसीचा खून केल्यानंतरही नितीन निश्चल आणि आरामात आहे. दोन खून पचवून त्याला शांत झोप लागली. दरम्यान, ग्रामस्थांसह काही संस्थांच्या मदतीने नितीनच्या पत्नीचा 30 फूट खोल दरीत उत्खनन करुन मृतदेहाचा शोध सुरूच आहे. बांगडय़ा, स्वेटर, हाडे, साडी याच ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
क्रूरकर्म्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता
दोन खून करून सुद्धा कसला हि पश्चाताप संशयित आरोपीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तर गुरूवार, शुक्रवार दोन्ही हि दिवस घटनास्थळी संशयित आरोपी नितीन गोळे याला पोलिसांनी चांगलेच बोलते केले आहे. तर लवकरच आणखी काही हाती लागण्याची चिन्हे असल्याचे समजते. मिसींगचा फिर्यादी ते संशयित आरोपी नितीन गोळे याचा वाई पोलीस कसा तपास करतात यावर अनेक गुन्हय़ांची उकल लपलेली आहे अशी चर्चा वाई तालुक्यात रंगू लागली आहे.
सिरीयल किलर मिस्ट्रीने वाई तालुक्यासह जिल्हा पुन्हा हादरला
मिल्ट्रीची नोकरी सोडून परत आलेला नितीन गोळेने प्रेयसीसह बायकोला संपवले. मात्र याची कारणमिमांसा केली असता ‘पाय घसरला की खेळ खल्लास’, हे वास्तव समोर आले. मिल्ट्री सोडून आलेल्या नितीन गोळेचे लग्न मनिषाबरोबर ठरलं. ही मूळची त्याच गावातील असली तरी नितीन आणि मनिषाने सुरुवातीलाच आपला गोडीगुलाबीचा संसार कोल्हापूरात थाटला. दोघेही नोकरीला. परंतु याचदरम्यान मनिषा आणि अन्य एका एमआयडीसी कामगाराचे सूत त्याचकाळात जमले. त्यावेळी नितीनला याची सूतराम कल्पना नव्हती. त्यांचा संसार काही वर्षे सुखाने चालला. मात्र काही वर्षात नितीन गोळेला तिच्या शरीरासंबंधांवरुन संशय येवू लागला. आपल्या बायकोचे कोल्हापुरात लफडं सुरू आहे, ही मानसिकता ठाम झाल्यामुळंच त्यानं काही दिवस मनिषाला विश्वासात घेतलं आणि तिचा व्याहळीच्या ओढय़ात ‘खेळ खल्लास’ केला.
अन् नितीनचा डिटेक्टीव्ह स्वभाव वर आला
आपल्यापासून दोन मुलांना जन्म देणाऱ्या बायकोचा खेळ खल्लास केल्यानंतर अत्यंत कूल किंवा थंडा दिमाग ठेवलेल्या नितीनने नव्या जीवनाला सुरुवात केली. अडीच एकर शेतीबरोबरच साताऱ्यात चुटपूट काम करताना त्याची संध्या सोबत ओळख झाली. संध्या शिंदे आणि त्याचे रासरंग सुरू झाले. मात्र त्यात अडथळे आल्यानंतर नितीन गोळेचा मिल्ट्री भरती होण्याचा डिटेक्टीव्ह स्वभाव वर आला. आता तो संध्याची खातरजमा करू लागला. संध्याचा पती व्यसनी असल्याचे त्याला माहितच होते. मात्र तिच्या पतीचा मुंबईस्थित मित्र आणि संध्या यांचे लागेबंधे त्याला कळाले.
बायकोच्या अनैतिक संबंधाने संतप्त होवून तिचा खून केलेला नितीन गोळे संध्याच्या नव्या लफडय़ाने आणखीनच चेतावला. त्याने प्रेयसी संध्या शिंदे हिला कसे विश्वासात घेतले आणि व्याहळीच्या रानात गळा दाबून कसे खल्लास केले हा पोलीस तपास सुरूच आहे.
साडी, स्वेटर, बांगड्या, हाडे सापडली
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या डॉ. संतोष पोळ हत्याकांडाची पुनरावृत्ती वाई तालुक्यात झाली असून पत्नीसह प्रेयसीचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा नितीन गोळेची कसून तपासणी सुरू आहे. पत्नीचा मृतदेह पुरून ठेवलेल्या ओढय़ात शुक्रवारी दिवसभर खोदकाम सुरू होते. यावेळी मृत मनिषाची साडी, स्वेटर व बांगडय़ा तसेच मृतदेहाचे काही अवशेष सापडले आहेत. मृतदेहाची कवठी सापडली नसल्याने भुईंज पोलीस व सहय़ाद्री टेकर्सच्या माध्यमातून सुरू असलेले शोधकार्य सुरूच राहणार आहे, अशी माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकारांना दिली.