ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज संविधान दिनानिमित्त संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, टीएमसी, दुमुक यासह 14 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता घराणेशाहीवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसचा उल्लेख ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ असा करत वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाकडून चालविले जाणारे पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचे म्हटले आहे.
मोदी म्हणाले, संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम स्थान दिले. मात्र, कालांतराने राजकारणाचा नेशन फर्स्टवर एवढा परिणाम झाला की, देशाचे हित मागे राहिले. स्वातंत्र्यानंतर संविधान दिवस साजरा करायला हवा होता. जेणेकरून पुढील पिढय़ांना संविधान कसं निर्माण झालं हे कळलं असतं. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव व्हावं हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचं पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणं ही काळजीची बाब आहे.
संविधान दिनानिमित्त घराणेशाहीवर हल्ला चढवताना वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं. ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचं तत्व नाही, ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.