ऑनलाईन टीम / मुंबई :
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदीर भूमिपूजनचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. त्यातच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदीर मुद्द्यापेक्षा कोरोना मुद्दा महत्त्वाचा असून त्यासाठी प्रयत्न व्हावा असे म्हटले होते.
मात्र, त्यांचे नातू म्हणजेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका मांडली आहे.
पार्थ पवार यांनी या पत्राची सुरुवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असे मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असे आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केले आहे.
हे पत्र चार दिवसांपूर्वीचे आहे. तरी सध्या पार्थ पवारांच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पार्थ पवार यांची ही भूमिका वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राचा पक्षाशी काही संबंध नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.