प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच सीमाभागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणच्या पिकांना फटका बसला आहे. त्याचे सर्व्हेक्षण लवकरात लवकर करावे. महाराष्ट्रात पाऊस झाला तरी कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा या नद्यांना येणारे पाणी तसे कमी आहे. यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तरी देखील नदी किनारपट्टीवरील जनतेने सतर्क रहावे, यासाठी अधिकाऱयांनी जनतेला वेळोवेळी सूचना कराव्यात, असे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेवून त्यांनी ही सुचना केली आहे. सध्या कोविड नियंत्रणात आहे. असे असले तरी कोणीही निष्काळजी राहू नये. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व ती उपाययोजना करावी, असे त्यांनी आरोग्य विभागाला सांगितले आहे.
कृष्णा नदीचा जो प्रवाह आहे तो कमी आहे. 2.30 लाख क्मव्युसेस पाणी आल्यावरच पूर येवू शकतो. तसेच आता पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पूराची भिती नाही. काही ठिकाणी कापूस तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करावा, असे त्यांनी सांगितले. यावर कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी त्यासाठी पथके तयार करण्यात आली असून लवकरच सर्व्हे करण्यासाठी पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी सर्व्हे करुन तातडीने अहवाल तयार करावा, असे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. अलमट्टी जलाशयातून पाणी सोडण्याबाबत अधिकाऱयांनी योग्य विचारविनीमय करुन निर्णय घ्यावा, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर तसेच बेडची कमतरता पडू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, त्यावर डॉक्टर तुक्कार यांनी सध्या कोणत्याच प्रकारची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पाठबंधारे महामंडळाचे अभियंता अरविंद कणगली, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. एस. बी. मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.