कराड सोसायटीबाबत डॉ. अतुल भोसलेंचे अजून ठरेना
प्रतिनिधी /कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व रयत कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील यांच्या लढत होत आहे. दक्षिण कराडमध्ये भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्याकडे निर्णायक मते आहेत. या निवडणुकीतील भूमिकेबाबत छेडले असता, डॉ. अतुल भोसले यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे अत्यंत सन्माननीय असून उदयदादा हे अत्यंत जवळचे मित्र होते. निवडणुकीबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.
येथे भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यावेळी उपस्थित होत्या.
कराड सोसायटी गटात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. 140 मते या मतदारसंघात असून निर्णायक ठरू शकणारी मते डॉ. भोसले यांच्या गटाकडे आहेत. याबाबत छेडले असता डॉ. भोसले म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारी संस्था आहे. अनुभवाप्रमाणे सहकारातील निवडणुका समविचारी लोक एकत्र येऊन करतात. यात पक्षीय चिन्हाचा संबंध नसतो. प्रत्येकजण आपल्याला सोईची ठरणारी भूमिका घेत असतो. भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या लोकांची बैठक बोलवून त्यांचे विचार जाणून घेणार आहे. त्यानंतर योग्यवेळी भूमिका जाहीर करणार आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे अत्यंत सन्माननीय आहेत. तर उदयदादा हे अत्यंत जवळचे मित्र होते. उदयदादांच्या गटाशी आमची सलगी होती. कारणाने आता ती नाही. पालकमंत्र्यांचे बंधू आमचे चांगले मित्र असून पालकमंत्र्यांच्या गटाशी आमची पूर्वी सलगी होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार या नात्याने आम्ही भूमिका घेणार आहोत. दोन उमेदवार आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे. परंतु आम्ही ज्याला मदत करू, तो सहज निवडून येईल, असा आमचा दावा असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. प्रत्येक गोष्ट भविष्यात काय होणार, याचा विचार करून करता येत नाही. तसेच प्रत्येक गोष्टीच्या समीकरणाचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा होईल, याचाही विचार करून चालत नाही. जिल्हा बँक ही शिखर संस्था आहे. या बँकेचा फायनान्स सर्व कारखान्यांना असतो. कारखान्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी बँकेकडे जावे लागते. योग्य लोक निवडून जावेत, अशी सर्वांची भूमिका असते. आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ आणि आपल्यासमोर मांडू, असे ते म्हणाले.