कोरोनानंतर महापुराच्या काळातही बाळासाहेब पाटील फिल्डवर
देवदास मुळे/ कराड
राज्यासह जिल्हा गेली दीड वर्षे कोरोना महामारीला तेंड देत असताना आता जिल्हय़ाला आस्मानी संकटाचा तडाखा बसला आहे. या संकटाच्या काळात जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तत्परतेची प्रचिती जिल्हा अनुभवत आहे. प्रशासनाला बरोबर घेऊन संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी पालकमंत्री फिल्डवर असून ठिकठिकाणी भेटी देऊन संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत.
जिल्हय़ात नुकतीच अतिवृष्टी झाली. यात पाटण तालुक्यासह ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात गुरूवारी रात्री भूस्खलन झाले. त्यात लोक गाढले गेल्याचे वृत्त आल्यानंतर शुक्रवारीच पालकमंत्री आंबेघरला गेले. मात्र ओढय़ाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना पुढे जाता आले नाही. त्यामुळे परत येऊन ते वाईला गेले. तेथे दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. तेथून साताऱयात अतिवृष्टीची आढावा बैठक घेऊन रात्री कराड शहरातील पूरस्थितीची प्रशासनासमवेत पाहणी केली. शनिवारी पाणी कमी झाल्यानंतर ते पुन्हा आंबेघरला गेले. वाहन जात नसल्याने अडचणींचा सामना करत आंबेघरला पोहोचले. याशिवाय तालुक्यात अन्य ठिकाणीही त्यांनी भेटी दिल्या. नुकसान झाल्यानंतर जिथे स्थानिक संस्थांचे पदाधिकारी पोहोचलेले नव्हते, अशा ठिकाणीही त्यांनी भेटी दिल्या. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाच्या निमित्ताने कोयना व रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱयाच्या निमित्ताने सातारा तर सोमवारी त्यांनी कराड तालुक्यात दक्षिणेतील नांदगाव, पोतले, येणके, तांबवे या गावांना भेटी देऊन पाहणी केली.
कोरोनाच्या संकटानंतर महापूर आणि भूस्खलनाचे संकट जिल्हय़ावर ओढवलेले असताना पालकमंत्री दिवसभर जिल्हय़ात नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत. संपूर्ण जिल्हय़ात रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. अतिवृष्टीनंतर जिल्हय़ात 40 ते 45 नुकसानग्रस्त गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत.गेले दीड वर्ष कोरोना महामारीचे संकट असतानाही पालकमंत्री जिल्हय़ाच्या मदतकार्यात सतत गुंतलेले दिसत होते. अनेकवेळा चुकीचे दबावही त्यांना सहन करावे लागले. मात्र प्रशासनाला खचू न देता मोकळीक देत, प्रसंगी जाब विचारत कोरोनाचा लढा सुरू ठेवला. सद्यस्थितीत कोरोनाची लाट ओसरत असताना आस्मानी संकट उभे राहिले असताना कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन गतिमान करण्याचे काम ते करत आहेत. संकटकाळात जिल्हय़ाला पालकमंत्री या नात्याने भरपूर वेळ दिला आहे. तो यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी दिला नव्हता, हीही वस्तुस्थिती आहे.
पालकमंत्र्यांच्या छायाचित्राला लाखो लाईक्स
दुर्घटनाग्रस्त आंबेघरला जाताना पालकमंत्री 4 किलोमीटर चालत गेले. एका ठिकाणी झाडावरून ओढा पार करत असतानाचे त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले. हे छायाचित्र सोशल मिडियावर ट्रेडींगमध्ये असून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर, ट्विटरवर शेअर करत सातारा जिल्हय़ाचे पालकमंत्री कसे काम करत आहेत, याचा दाखला राज्याला देत त्यांचे कौतुक केले. पक्षासह अनेक तरूणांच्या फेसबुकवर आणि स्टेटसवर हे छायाचित्र झळकत आहे.