गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई; वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता; एसपी, आयजी यांच्याशी चर्चा करणार
प्रतिनिधी / सांगली
पालकमंत्री जयंतराव पाटील विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलवत नाहीत अशी तक्रार शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केली आहे. त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू. ते योग्य मार्ग काढतील, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांचा मेळावा राज्यमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, संपर्क प्रमुख नितीन बानूगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते आदी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी नाहीत नाराजी प्रकट केली होती. त्याबाबत विचारले असता राज्यमंत्री देसाई म्हणाले, विभूते यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. त्या पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालू. ते यातून मार्ग काढतील. जिल्ह्यातील घरफोडीसह गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे. त्याप्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे.
याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. त्याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करू. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. आज पासून राज्यात नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. कोरोना पासून संरक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले..