प्रतिनिधी/ रत्नागिरी
पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 17 जानेवारीला मुंबईत पहिल्या बैठकीचे आयोजन मंत्री ऍड. अनिल परब यांनी केले होते. या बैठकीला रत्नागिरीतील महत्वाच्या विभागाचे 9 प्रमुख अधिकारी अनुपस्थित होते. त्याशिवाय इतर काही विभागांचे 13 अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे या संबंधित 22 अधिकाऱयांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
परिवहन तथा पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबईत अनुपस्थित असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱयांबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हय़ाच्या विकासासंदर्भात बैठक बोलावली असताना अधिकाऱयांनी अनुपस्थित राहणे, ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीला अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी रत्नागिरी, जिल्हा प्रशासन अधिकारी, कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त चिपळूण, उपअभियंता विद्युत उपविभाग रत्नागिरी, जिल्हा उद्योग केंद्र, मुख्याधिकारी खेड, मुख्याधिकारी राजापूर, मुख्याधिकारी गुहागर, मुख्याधिकारी मंडणगड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि. प. रत्नागिरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प. रत्नागिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.जि.प.रत्नागिरी), कार्यकारी अभियंता जि.प.बां.वि. रत्नागिरी, कार्यकारी अभियंता जि.प. बां. वि. चिपळूण, उपअभियंता (यांत्रिकी) ग्रापापु विभाग जि. प., प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प., उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) जि. प., उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) जि. प. आदी 22 विविध विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित होते.
बैठकीला वेळेत यायला शिका…
पालकमंत्र्यांच्या रत्नागिरीतील नियोजन बैठकीला तब्बल 19 अधिकारी उशीरा आल्याने त्यांना अल्पबचतच्या सभागृहाबाहेरच उभे रहावे लागले. बैठक संपता-संपता या अधिकाऱयांनी हजेरी लावल्याने पालकमंत्र्यांनी त्यांना बाहेर रहा, असे सांगितले. नुसते सोपस्कर म्हणून बैठकीला येवू नका. आपली जबाबदारी प्रामाणिकपण पार पाडायची असेल तर बैठकीला वेळेत यायला शिका, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त पदभारामुळे अधिकाऱयांची दमछाक
जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्याकडे 6 जिल्हय़ांचा पदभार तसेच कोकण विभागाची जबाबदारी, रत्नागिरी पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी आहे. यात रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे वारंवार दौरे, कौशल्य विकास अधिकारी यांच्याकडे 3 जिल्हे रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग 2 जिल्हे-रायगड व रत्नागिरी जिल्हय़ाची जबाबदारी आहे. या सर्व अधिकाऱयांची कामे करताना दमछाक होत असून नेमके काय काय करायचे, असा प्रश्न या अधिकाऱयांसमोर नेहमीच असतो. त्यामुळे हे अधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याची चर्चा आता जिल्हा प्रशासनामध्ये सुरू झाली आहे.
.