जिल्हा नियोजन समिती सभा हाताळली कौशल्याने : नारायण राणेंनीही थोपटली पाठ
- पहिल्याच सभेत पालकमंत्र्यांकडून अधिकाऱयांची झाडाझडती
- अनुपस्थित सोळा अधिकाऱयांना ‘शो कॉज’, दोन दिवसांची मुदत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन ठरावाला राणेंनी दिले अनुमोदन
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
पक्षीय राजकारण करीत एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर सत्ताधारी व विरोधकांची एकत्र मोट बांधत वाटचाल करण्याचा वायदा करीत, सभाशास्त्रात पारंगत असलेल्या राणेंसारख्या महारथी म्हणून ओळखल्या जाणाऱया कट्टर विरोधकांचे मन जिंकत पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा जवळपास एकहाती जिंकलीच. सभा कशी चालवावी, प्रश्न कसे समजून घ्यावेत, प्रशासनावर कसा अंकुश ठेवावा, विरोधकांच्या तोफांचा सामना कसा करावा, या सर्वांचे एका निष्णांत नेत्यासारखे प्रदर्शन करीत पालकमंत्री सामंत या सभेचे ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरले. दस्तुरखुद्द नारायण राणेंनी यांनीही पालकमंत्री सामंत यांच्या सभा हाताळण्याच्या कौशल्याचे कौतुक करीत, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खरं तर नवे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीतील ही सभा वादळी ठरणार, अशीच शक्यता वर्तविण्यात येत होती. चांदा ते बांदा योजनेवरून माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोंडीत पकडण्याचे मनसुबे विरोधकांनी अगोदरच रचले होते आणि झालेही तसेच. सभेच्या सुरुवातीलाच खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री उदय सामंतांच्या मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला चक्क अनुमोदन दिले. जर माझ्या या जिल्हय़ाच्या विकासासाठी मुख्यमंत्री प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतील, तर माझं त्यांना निश्चितपणे सहकार्य राहील, असे राणे म्हणाले. मात्र हे सांगत असताना मागील पाच वर्षांत जिल्हय़ाच्या विकासाचे वाटोळे झाले. तसा कारभार नव्या पालकमंत्र्यांकडून होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी केसरकरांचे नाव न घेता त्यांना डिवचलेच.
निधी कोटीत आणला, मग खर्च किती झाला ते सांगा!
पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी पालकमंत्री केसरकर यांनी आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 240 कोटी इतका विक्रमी निधी यावर्षी या जिल्हय़ात आणल्याचे निदर्शनास आणले. तर आमदार नाईक यांनी राणे यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत आणण्यात आलेल्या निधीची यादी वाचत केसरकरांची कारकीर्द उजवी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण राणे यांनी निधी किती आणला ते सांगू नका. जिल्हय़ाच्या विकासासाठी खर्च किती केला, ती आकडेवारी सांगा. आणलेला निधी खर्च करण्याची कुवत नसेल, प्रशासनावर वचक ठेवता येत नसेल, तर तुमचे हे कोटीचे आकडे काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राणेंच्या या टीकेने दुखावलेल्या केसरकर यांनी अनपेक्षितपणे सभेतून एक्झीट घेत अप्रत्यक्षपणे आपली नाराजी स्पष्ट केली.
अधिकाऱयांची झाडाझडती आणि इशाराही
पालकमंत्री म्हणून आपल्या या पहिल्याच सभेत पालकमंत्री सामंत यांनी सभेस उपस्थित खातेप्रमुखांची अक्षरश: झाडाझडती घेत इरादा स्पष्ट केला. मी या सभेस प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून आलोय. मला खोटी आणि तकलादू उत्तरे मुळीच चालणार नाही. विकासाच्या आड येणाऱया, कामचुकारपणा करणाऱया व भ्रष्ट अधिकाऱयाला निलंबित केल्याशिवाय मी राहणार नाही. नियोजन मंडळ हे जिल्हय़ाच्या विकासासाठी असते. आजच्या या सभेला अनुपस्थित राहिलेल्या सोळा खातेप्रमुखांना आजच्या आज ‘शो कॉज’ नोटीस इश्यू करून 48 तासांच्या आत त्यांचे म्हणणे मागवून घ्या, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले. या सभेत कामे पूर्ण करण्याबाबत आपण सभागृहासमोर जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता पुढच्या सभेपूर्वी न झाल्यास सदर अधिकाऱयाची मी मुळीच गय करणार नाही, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱयांना इशारा दिला.
पूर्वीच्या पालकमंत्र्यावर हक्कभंग आणला असता, पण.. – राणे
केसरकर सभा सोडून निघून गेले, तरी त्यांना घेरण्याची एकही संधी न सोडता नारायण राणे म्हणाले, पालकमंत्री कसा असू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणून केसरकरांकडे पाहाता येईल. खरं तर डी. पी. डी. सी. मध्ये सदस्यांनी सूचवलेली कामेच मंजूर करायची असतात. घटनेत तशी तरतूदही आहे. मागील पालकमंत्री सदस्यांकडून कामे मागून घ्यायचे. मात्र ही कामे मंजूर न करता ते आपण स्वत:हून कामाची यादी तयार करून ती कामे मंजूर करून घ्यायचे व स्वत:च्या सहीशिक्क्यानिशी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पाठवायचे. खरं तर नियोजनमधील सदस्यांच्या हक्कावरील ही गदा होय. याबाबत लेखी पुरावे माझ्या हातात आले होते. मी या पालकमंत्र्यांवर हक्कभंगही आणू शकतो असतो. परंतु, आपल्या जिल्हय़ाचीच नाचक्की होईल म्हणून मी ते टाळलं. विकासकामांत पक्षपात केल्यामुळेच या जिल्हय़ाच्या विकासाचा बट्टय़ाबोळ झाल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. या आरोपावर बोलताना वैभव नाईक यांनी माजी पालकमंत्री केसरकर यांनी सदस्यांना विश्वासात घेऊनच कामे मंजूर केली होती, असे सांगितले. आमदार नाईक यांच्या या दाव्यावर नारायण राणे, नीतेश राणे तसेच सर्व विरोधी सदस्यांनी एकच हंगामा केला. शेवटी पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करीत सर्व सदस्यांना शांत केले.
‘चांदा ते बांदा’ गुंडाळल्यावर चर्चा
‘चांदा ते बांदा’ योजनेच्या वास्तवावर या सभेत बराच वेळ चर्चा झाली. खासदार राणे यांनी गुंडाळलेल्या या योजनेची चर्चा करून सभागृहाचा वेळ का वाया घालवता, असा सवाल पालकमंत्र्यांना केला. ही योजना डब्यात जाणार हे मला अगोदरच माहीत होतं, असं ते म्हणाले. यावर बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांदा ते बांदा ही योजना गुंडाळलेली नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर आमदार नाईक यांनी या योजनेंतर्गत जिल्हय़ाला प्राप्त झालेला निधी परत जाणार नाही, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना पालकमंत्र्यांना केली. मग पालकमंत्र्यांनी खासदार राणे यांचे मार्गदर्शन घेत आपण सर्वांनी तसा प्रयत्न करुया, असे सूचवले व राणेंनी देखील यास संमत्ती दिली.
आजच्या या सभेत प्रलंबित राहिलेल्या व सदस्यांनी सूचविलेल्या अनेक कामांना पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने या नव्या पालकमंत्र्यांच्या अभिनंदनासाठी विरोधी सदस्यांमध्येही अक्षरश: चढाओढ लागलेली दिसत होती. या सभेत नीतेश राणे मात्र काहीसे शांत होते. जि. प. उपाध्यक्ष व नियोजन सदस्य राजन म्हापसेकर, दादा कुबल, रणजित देसाई, अंकुश जाधव व संजय पडते यांनी अनेक प्रश्न सभागृहात मांडत त्यावर चर्चा घडवून आणली.