शिक्षण खात्याचे परिपत्रकाद्वारे निर्देश
प्रतिनिधी /पणजी
पालकांकडून हमीपत्रे घेऊन झाल्यानंतर आता शिक्षण खाते उशिराने जागे झाले असून तशी पत्रे शाळांनी घेऊ नये असे निर्देश खात्याने आता जारी केले आहेत. तशा आशयाचे परिपत्रक खात्याने काढले असून ते सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना पाठविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आठ दिवसांपूर्वी म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्यानंतर बहुतेक सर्व शाळांनी (सरकारी शाळा वगळून) मुलांना शाळेत काही झाले तर शाळा जबाबदार राहाणार नाही, अशा आशयाची हमीपत्रे घेण्यात येऊ लागली, त्यास पालकांनी विरोध केला होता. शिवसेनेने अशी हमीपत्रे घेण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. हा विषय शिक्षण क्षेत्रात चर्चेचा बनला होता. एवढे झाल्यानंतर देखील शिक्षण खात्यने त्याची कोणतीच दखल घेतली नव्हती. पालकांनी देखील अशा हमीपत्रावर बंदी घालण्यास सूचवले होते. त्यावेळी शिक्षण खात्याने तातडीने दखल घेऊन वरील आशयाचा आदेश जारी करणे आवश्यक होते परंतु खाते आठ दिवस गप्प बसले आणि आता बहुतेक शाळांनी हमीपत्रे घेतल्यानंतर जागे झाल्याचे समोर आले आहे. शिक्षण खात्याचा हा कारभार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असा असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून होत आहे.