ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं दिली. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय गेल्या चार वर्षांपासून बोर्डाची परीक्षा देणाऱ्या आणि इतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणखी वाढवण्याच्या दृष्टीनं ‘परीक्षा पे चर्चा’ सत्राचे आयोजन करत आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद देत असतात.
सध्या देशभरात परीक्षा सुरु आहेत. अशात परीक्षार्थी विद्यार्थ्यांंचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांना परीक्षेची भीती दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शनही केलं तसेच परीक्षा ही आपल्या आयुष्यातील एक महत्तवपुर्ण पायरी असल्याचे मोदी म्हणाले. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी घाबरुन जाऊ नये. सोबत परिक्षेत कॉपी करण्याची गरज नाही, तुम्ही जे काही करता, ते पूर्ण आत्मविश्वासाने करत राहा, असे आवाहनही मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले.
ऑफलाईन आणि ऑनलाईन गोंधळ
कोरोना काळात झालेल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन परिक्षेवरुन मध्यंतरी बरेच वाद झाले. ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित होतं, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केली असता, त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं. ऑफलाइन ऑनलाईन सारखेच आहे. माध्यम ही समस्या नाही. कोणत्याही माध्यमाची पर्वा न करता परिक्षा द्यावी. आपले मन जर विषयात गुंतले , तर काही फरक पडणार नाही. ते म्हणाले,”माझ्या मनात एक गोष्ट येतेय की, तुम्ही विचार करा की, तुम्ही ऑनलाईन वाचत असता की रिल्स पाहत असता? मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही. पण तुम्हाला कळलं की मी तुम्हाला पकडलंय. खरंतर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल वर्गातही अनेकदा तुमचं शरीर वर्गात आहे, डोळे शिक्षकांकडे आहेत पण एकही गोष्ट कानात जात नसेल. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे. माध्यम कोणतंही असून माझं मन जर त्याच्याशी जोडलेलं आहे, त्यात मग्न आहे, तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही फरक पडतो.
विद्यार्थ्यांवर दबाव नको
पुढे मोदी यांनी तंत्रज्ञानाविषयी भाष्य करताना म्हटले, “तुमच्यात असलेले कौशल्ये खूप महत्त्वाचे आहेत. तंत्रज्ञान हे त्रासदायक नाही मात्र त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आज विद्यार्थी तंत्रज्ञान आपल्या कार्यक्षमतेने वापरत आहेत.” पालक आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावेत यासाठी दबाव आहे असे विद्यार्थ्यांना वाटू नये. पालकांनी मुलाला इतकेच मार्क पडावेत असा आग्रह धरु नये. पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याचा विचार करण्याची मुभा द्यावी, असेही मोदी म्हणाले.