ऑनलाइन टीम / मुंबई :
पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडी ने चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, या घटनेनंतर अवघ्या आठ तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या 101 लोकांची यादी मी फेसबुकच्या माध्यमातून जाहीर करत आहे. हे प्रकरण केवळ अफवांमुळे घडले आहे.
पालघर मधील घटनेबाबत जातीचं राजकारण करण्यात आले ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. यामध्ये सर्व पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे ही वेळ राजकारण करायची नाही तर कोरोना लढाईत एकत्र येऊन लढण्याची आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.