ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदवस वाढतच चालली आहे. राज्याचा आकडा चार हजार च्या वर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भीतीचे सावट आले आहे. काल त्यांनी जनतेशी संवाद साधला. तसचं आज पण त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालघर मॉब लिचिंग प्रकरणी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, पालघर मध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. गडचिंचली या भागात तिघांची हत्या यामध्ये धार्मिक कारण नाही. हे प्रकरण गैरसमजुतीतून झालेले आहे. यात पोलिसांवर ही हल्ले झाले आहेत. या प्रकरणी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पाच महत्वाच्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोणीही यामध्ये धार्मिक कारण शोधू नये.
या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणे झाले आहे. काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असं ही उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, कोरोनाशी युद्ध ही आजची प्राथमिकता आहे. आज पहिला रुग्ण सापडून सहा आठवडे पूर्ण होत आहेत. काही ठिकाणी बंधने शिथिल केली आहेत. मात्र, याचा अर्थ संकट कळले आहे असा समज कृपया करून कोणी करून घेऊ नका. लॉक डाऊन टळलेला नाही. फक्त रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा गती द्यावी म्हणून आपण ही सुरुवात केली आहे. त्यामुळे आता शिस्त पाळणे हे आपल्या हातात आहे. शिस्त पाळली तर आपल्यावरील बंधने शिथिल होतील. असं ही त्यांनी यावेळी सांगितले.