प्रतिनिधी / सातारा
आपला जिल्हा रेड झोनमध्ये आहे. याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. सर्वप्रथम आम्ही आपल्या पालिकेचे सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आहे. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी पालिकेने घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आहे. यामुळे लोकांमध्ये खूप भितीचे वातावरण आहे. भारतामध्ये सुद्धा या महामारीने रौद्ररूप धारण केले आहे. यामध्ये महाराष्ट्रचा नंबर अगदी वर आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असणाऱ्या जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित केले आहे. आपला सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. सर्वप्रथम आम्ही आपल्या पालिकेचे सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अधिकारी-कर्मचारी- कामगार यांचे अभिनंदन करतो आहे. कारण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता काम करत आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्यावतीने विनंती करतो की, कोरोना योद्धा असणारे सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांची कोविड-19 टेस्ट करण्यात यावी. ज्या कर्मचाऱ्यांची लक्षणे नाजूक सापडतील त्यांना होम क्वारंटाईन करण्यात यावे. त्यांना कामाची जबरदस्ती करण्यात येऊ नये. नाहीतर यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जिल्हा माहिती कार्यालयाच्या कार्यालयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील 24 आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात दाखल केलेले आहे. कोरोनो योद्धा यांचा सातत्याने कामानिमित्त नागरिकांची संपर्क वाढत आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आरोग्य कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी यांना त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी पीपीई किट, हँड सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क, शूज, डोक्यावरील टोपी, अत्यावश्यक साधने उपलब्ध करण्यात यावे. जेणेकरून भावी धोका टळेल. आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असणारे कामगार यांचा तात्काळ विमा काढण्यात यावा. आरोग्य कर्मचारी, अधिकारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, अशा मागण्या केल्या आहेत. निवेदनावर वंचितचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण देसाई, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, वंचित जिल्हा संघटक गणेश भिसे यांच्या सह्या आहेत.