गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला संशय : विरोधकांना बेफिकीर ठेवण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी / मडगाव
पालिका निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी निवडणूक आयोगाला जेव्हा योग्य वाटते तेव्हा निवडणुका घेण्याची मुभा देण्यात आल्याने जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांप्रमाणे त्या अचानक जाहीर केल्याही जाऊ शकतात, असा संशय गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा पंचायत निवडणुका जानेवारीत घेतल्या जातील असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले होते. मात्र जेव्हा योग्य वाटते तेव्हा निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला त्यावेळीही देण्यात आला होता व अचानक डिसेंबरमधे निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. विरोधकांना बेफिकीर ठेवून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न अशा प्रकारे सरकारकडून होत असल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणूक लढविण्याची तयारी चालविलेल्यांनी याकडे नजर ठेवताना जनतेच्या संपर्कात राहून सरकारची जनताविरोधी धोरणे मतदारांना पटवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मग परीक्षा ऑफलाईन का ?
एकीकडे कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येत असून तसे असल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला. आपला पक्षाने प्रभाग आरक्षण व अन्य प्रक्रिया शेवटच्या क्षणी जाहीर करून सरकार मोकळे होत असल्यामुळे कित्येकांवर अन्याय होत असल्याने त्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा आरक्षण व अन्य प्रक्रिया तीन आठवडे आधी जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
सतर्क राहण्याची गरज
आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक अधिसूचना जाहीर होते. म्हणजे महिन्याभराचा काळ लागणार होता. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता, असे ते म्हणाले. मात्र निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले असले, तरी त्या अचानक जाहीरही केल्या जाऊ शकतात. यासाठी सतर्क राहण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा अधिवेशनात पालिका कायद्यात काही दुरुस्त्या करण्याचा सरकारचा बेत असण्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली. तसेच सरकारी नोकऱया देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. त्याच्या जाहिराती आता पालिका निवडणुकीच्या आधी देऊन लोकांना फसविण्यासाठी ते थांबले आहेत, असाही दावा त्यांनी केला.