त्रिशंकू भाग,गोळीबार मैदान, शाहूनगर नेतृत्व नसल्याने विकासापासून वंचित
प्रतिनिधी/ गोडोली
ऐतिहासिक सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून नव्याने गोडोली परिसरातील त्रिशंकू भाग, शाहूनगर, गोळीबार मैदान भागाचा समावेश झालेला आहे.याच भागात मुलभूत सोईसुविद्यांची वाणवा असून त्या सोडविण्याबाबत अद्याप नगरपालिकेकडून कोणतीही हालचाल सुरू नाही. तर हद्दवाढीसाठी आग्रही असलेली मंडळी सुध्दा अद्याप गप्प असल्याने या भागातील नागरिकांना नगरपालिकेतील समावेशानंतरचे सुख अनुभवता आले नाही. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी नव्याने समावेश झालेल्या भागाचा दौरा करून स्थानिक प्रश्न समजून घेवून ते सोडविण्यासाठी उपाय योजना कराव्यात,अशी मागणी माजी नगरसेविका आणि सातारा जिल्हा महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले.
नगरपालिकेची हद्दवाढ झाली तर अजूनही गोडोली परिसरातील त्रिशंकू भागाकडे प्रशासन काही लक्ष देत नाही.मुलभूत सोईसुविद्या वाणवा असलेल्या त्रिशंकू भागात नियमाप्रमाणे रस्ते आणि घरांची बांधकामे नाहीत.अनेक ठिकाणी अतिक्रमण करून अनेकांनी आपल्या सोईस्कर असे रेटून बांधकाम केले आहे.,सांडपाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने शोषखड्डे नाही तर मोकळया जागेत ते सोडून मोकळे झाले आहेत.पथदिवे लावलेले नसल्याने रात्री सर्वत्र अंधार दाटून येत असतो.मात्र लोकप्रतिनिधींच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी, शासकिय अधिकाऱयांनी आपल्या कॉलनी,परिसरात पक्के रस्ते, गटारांची कामे करून घेतली आहेत.तर त्यांच्याच कॉलनीत पथदिवे लागलेले दिसतात.
ऐतिहासिक सातारा नगरपालिकेत नव्याने समावेश झाल्याने त्रिशंकू भागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. किमान रस्ते, पथदिवे, सांडपाण्याची व्यवस्था तर करण्यासाठी पालिकेने सुरूवात करावी.प्रत्येकाने नगररचना विभागाच्या मंजूरीशिवाय परस्पर आपल्या सोईनुसार रस्ते करत आपल्या घराची बांधकामे केली आहेत.गेल्या 25 वर्षात वाढत गेलेला विस्तार आता अतिक्रमण,गैरसोईचा,मुलभूत सोईसुविद्या नसल्याने वैतागलेल्या नागरिकांना हद्दवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.हद्दवाढीचा निर्णय होऊन ही अद्याप पालिकेकडून मुलभूत सोईसुविद्या देण्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सुदामदादा गायकवाड यांनी तरूण भारत शी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधी हद्दवाढीसाठी जसे आग्रही होते,तसे त्रिशंकू भागाच्या विकासासाठी ही आग्रह राहतील,हा विश्वास असून त्यासाठी अजून ही किती काळ वाढ पाहवी लागणार, असा प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्रिशंकू भागाला सध्या स्थानिक प्रश्न मांडणासाठी स्थानिक नेतृत्व नसल्याने पालिकाकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणी नाही.सध्या पालिका ही लक्ष देत नसल्याने प्रश्न जैसे थे आहेत. निवडणूकीला अजूनही अंदाजे 8 महिन्याचा कालावधी असून तोपर्यंत मुख्याधिकाऱयांना नव्याने समावेश झालेल्या भागातील दौरा करून नागरिकांशी संवाद करावा. किमान मुलभूत सोईसुविद्या देण्यासाठी प्रयत्न करावा,अशी अपेक्षा ऍड.सचिन तिरोडकर यांनी व्यक्त केली आहे. नगरपालिकेने नव्याने समावेश झालेल्या भागांची पाहणी आणि नागरिकंशी संवाद केल्याशिवाय मुलभूत अडचणी माहिती होणार नाहीत.स्वच्छता,पथदिवे,रस्ते,ओढयावरील आणि मोकळया जागांतील अतिक्रमण या समस्या प्राधान्यांने सोडविल्या पाहिजेत. स्थानिक नागरीकांकडून पालिकेकडून मोठया अपेक्षा आहेत.मात्र विकास,मुलभूत सोईसुविद्यांसाठी अद्याप कोणतीच हालचाल नसल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी नाराजी व्यक्त केली.