वार्ताहर/ कराड
कराड नगरपरिषद हद्दीतील मिळकतदारांची 2020 व 2021 या वर्षांतील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माजी नगरसेवकांनी चर्चा केली.
यावेळी मंचचे अध्यक्ष ऍड. सतीश पाटील, सुभाषकाका डुबल, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, नंदकुमार बटाणे, घनश्याम पेंढारकर, दीपक पेंढारकर, हरिष जोशी, आनंदराव लादे, ऍड. मानसिंगराव पाटील, विजय मुठेकर, अमृत देशपांडे, उदय हिंगमिरे, प्रमोद वर्णेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जवळपास दीड वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय व उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. व्यवसाय बंद असले, तरी लोकांना गाळा भाडे, वीज बिल, घरपट्टी, पाणीपट्टी आदी प्रकारची सरकारची सर्व देणी द्यावी लागत आहेत. व्यवसाय बंद असल्याने लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी किमान पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. याची दखल घेऊन माजी नगरसेवक विचार मंचच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांची भेट घेऊन घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.