रविवार पेठ, सदरबाजार परिसरात अस्वच्छता
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष सातारा शहरात आहे. रविवार पेठेत लोणार गल्लीत शौचालयाच्या लगतच कचरा तसाच साठून राहिलेला आहे. तो उचललेला नाही, अशी तक्रार मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी केलेली आहे. तसेच सदरबाजार परिसरात लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी या भागात स्वच्छता पालिकेच्या माध्यमातून केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे, अशीही तक्रार सागर भिसे यांनी केलेली आहे.
सातारा शहरात नियमितपणे कचरा उचलला जात नाही. अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून आहे. कित्येकवेळा पालिकेच्या आरोग्य विभागाला सांगूनही कचरा तसाच ठेवण्यात येतो. जे नागरिक उघडय़ावर कचरा टाकणाऱयांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी एकदाही कारवाई करण्यात आलेली नाही. रविवार पेठेतल्या लोणार गल्लीत कचरा तसाच पडून आहे. मी पालिकेच्या आरोग्य विभागाला सांगून दमलो आहे. आता आंदोलन छेडावे लागेल असे मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी सांगितले. दरम्यान, सदरबाजार येथील परिसरात लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी या परिसरात अस्वच्छता आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिक जेथे राहतात तो परिसर स्वच्छ असायला हवा. मात्र याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अक्ष्यम दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार सागर भिसे यांनी केलेली आहे.