अभियंत्यांनी केली होती पहाणी ; केबीपीच्या विद्यार्थ्यांनी पाहणी न केल्याने पुढची प्रक्रिया ठप्प
विशाल कदम/ सातारा
सातारा पालिकेच्या शाळा क्रमांक 13, शाळा क्रमांक 12 व शाळा क्रमांक 14 ज्या इमारतीत भरवल्या जातात. त्या इमारतीला तब्बल 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ही इमारत अतिशय जीर्ण झाली असून कधीही पडू शकते. अशा इमारतीत अजूनही शाळा भरवण्यात येत असल्याने पालकवर्गासह परिसरातील नागरिक सध्या संतप्त आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे यांनी पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्याने इमारतीची स्वच्छतागृहाची पडत आलेली पाईप काढून टाकण्यात आली. दरम्यान, या इमारतीतील शाळा अन्य ठिकाणी भरवण्यात यावी, अशी तोंडी सुचना पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे. तर पालकांनी याच परिसरात शाळेची सोय करावी अशी मागणी केली आहे.
सातारा नगरपालिकेच्या शाळांची अवस्था खूपच दयनिय बनली आहे. ग्रामीण भागात अंतराची अट शाळांना लावली जाते. शहरात मात्र त्याच अटीला खो घातला जात आहे. एकाच इमारतीत तब्बल तीन शाळा भरवण्यात येत असून ज्या इमारतीत शाळा भरवण्यात येत आहेत. त्या इमारतीला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या इमारतीची अवस्था अतिशय दयनिय अशी झालेली आहेत. इमारतीला तडे गेलेले आहेत. भिंतीला भेगा पडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर पिलरही खराब झाल्याचे दिसून येत आहे. या इमारतीबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांनी प्रथम लेखी निवेदन दिले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे आणि सुधीर चव्हाण यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यांनी वरच्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या पाईपलाईनचा तुकडा निसटत आला होता. तो जेसीबीच्या सहाय्याने काढण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर लगेच जेसीबीने तो काढण्यात आला. तसेच इमारत धोकादायक आहे कोणीही जवळ जावू नये अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. दरम्यान, याच इमारतीत काही व्यापाऱयांचे गाळे आहेत, काहींचे कार्यालयही आहे. एकदोन वगळता सगळय़ांनी आपल्या गाळय़ांचे शटर डाऊन करुन त्यातील माल दुसरीकडे हलवला आहे. दरम्यान, तीन शाळा अजूनही भरवण्यात येत आहेत. त्यातील दोन शाळांनी सोमवारी स्थानिक सुट्टी घेवून शाळेकरता जागा शोधण्याचे काम मुख्याद्यापक करत होते. पालकांची दुपारी बैठक झाली. त्या बैठकीत पालकांनी स्पष्ट शब्दात मुख्याद्यापकांना विनंती केली की शाळा याच परिसरात भरवण्यात याव्यात, आमची मुले अन्य ठिकाणी येणार नाहीत, अशी विनंती केली आहे. पालिका प्रशासनाने शाळा शनिवारी पेठेतील राजलक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील समाज मंदिरात व रविवार पेठेतील गितांजली शाळेत हलवण्यात यावी, अशी तोंडी सुचना दिल्या आहेत. त्याच पालकांनी विरोध केला आहे. पालकांनी धोकादायक इमारतीत शाळा भरवू नये, शाळा याच परिसरात अन्य इमारतीत भरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
धोकादायक इमारतीत शाळा भरवता कशाला?
आमच्या इथली पोरं शाळेला येतात येथे. इमारतीला तडे गेलेले आहेत. इमारत पडली बिडली आणि दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?, त्यापेक्षा लवकर इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधावी, तात्पुरती शाळा इतर ठिकाणी भरवावी.
मेहमुद रफिक खान नागरिक
माजी नियोजन सभापती अलिशेठ यांचा पाठपुरावा
माजी नियोजन समितीचे सभापती अलिशेठ यांचेही कार्यालय याच इमारतीत तळमजल्यात आहेत. त्यांनी या इमारतीची डागडुजी व्हावी याकरता सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. आताही त्यांनी इमारत धोकादायक बनली असून ती इमारत लवकरात लवकर उतरवून घ्यावी, धोकादायक परिस्थितीत ठेवू नये, अशीही विनंती केली आहे.
प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांना सवडच मिळेना
पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांनी पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय शिर्के शाळेत हलवले. परंतु ज्या धोकादायक इमारतीत तीन शाळा भरतात त्याकरता कसलाही प्रयत्न केला नाही. त्यांच्याशी याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा फोनही बंद लागला. त्यांना या तीन शाळेकडे बघायला सवडच मिळेना झाली आहे. ते नवीन कार्यालयात रमून गेले आहेत. त्या कार्यालयाला लागून असलेली शाळा चांगली आणि सजवलेली असल्याने त्या शाळेमध्ये ते रमले गेले आहेत. इतर शाळांची अवस्था पहायला त्यांना सवड नाही, अशी चर्चा सुरु आहे.