प्रतिनिधी/ सातारा
शासनाच्या निर्णयानुसार मागील महिन्यापासुन इयत्ता 5 वी पासुनचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता हा निर्णय शिक्षण विभागाने घेण्यात आला होता. याकरीता कोरोना संसर्गाबाबतचे सर्व नियम पाळत या शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू करण्याच्या या निर्णयाला पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र याला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
शाळा सुरू होऊन आता महिना उलटत असला तरी पालिकेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच आहे. साताऱयात पालिकेच्या एकुण 12 शाळा आहेत. येथे इयत्ता 1 ली पासुन ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. सध्या इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग येथे सुरू असुन यामध्ये 566 इतके विद्यार्थ्यांची नोंद आहे. पण इयत्ता 5 ते 8 वी चे केवळ 303 विद्यार्थी हे सध्या नियमित शाळेत येत आहेत.
उर्वरित विद्यार्थी हे शाळेकडे अजुन फिरकले देखिल नाहीत. आधीच पालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यातच उपस्थिती देखिल कमी झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. तरी याची दखल घेत पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थी पुन्हा शाळेकडे कसे वळतील याकरीता प्रयत्न केले पाहिजे.