प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात पालिकेच्यावतीने जेवढय़ा गळत्या लागलेल्या आहेत. त्या गळत्या काढण्याचे काम पालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः गळत्यांच्या कामाकडे लक्ष घातले आहे. दररोज पालिकेत आल्यानंतर ते पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेतात. किती कोणत्या भागातील गळत्या काढण्यात आल्या याची ते माहिती घेतात. पालिकेच्या समोरच नेहमी लागते ती गळती कायमस्वरुपी काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काम सुरु आहे.
सातारा शहरात 90 ठिकाणी लागलेल्या गळत्या काढण्यासाठी पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सुचना दिल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने पथके तयार करुन तशा सुचना दिल्या आहेत. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे पालिकेत आल्यानंतर दररोज पाणी पुरवठा विभागाचे संदीप सावंत यांच्याकडून कामाचा आढावा घेतात. काल किती गळत्या निघाल्या, आज किती गळत्या काढण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. कुटे कुठे टीमा जाणार आहेत, याची माहिती घेवून ते सुचना करतात. सातारा पालिकेपासून काही अंतरावर केसरकर पेठेत असणाऱया गळतीचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून ही गळती काढण्याचे काम सुरु आहे.