सर्वसामान्य सातारकर जनतेची आर्त हाक
विशाल कदम/ सातारा
कोरोनाचा कहर जगात माजला आहे.सातारा जिह्यात चांगलेच बाळसे धरू पाहत आहे.अशा धोकादायक परिस्थितीत लढायचे असेल, आलेल्या संकटावर मात करायची असेल तर सातारा पालिकेत सुरू असलेले राजकारण अगोदर थांबवावे, अन शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी एक होऊन लक्ष द्यावे, अशीच सर्वसामान्य सातारकर नागरिकांची अपेक्षा आहे.सत्ताधारी गटातच दोन गट एकमेकांना पाण्यात बघत राहिले तोंडावर गोड बोलून पाठीमागून रट्टा मारण्याची प्रथा सुरू राहिली तर शहरात परिस्थिती बिकट होण्याची शक्यता निर्माण होईल.त्यामुळे एक व्हा, दुजाभाव बाजूला ठेवा आणि शहरासाठी काम करावे अशी आर्त हाक सातारकर नागरिकांकडून दिली जात आहे.
सातारा पालिकेत खासदार उदयनराजे गटाची सत्ता आहे.मात्र, यांच्याच गटात जेवढे नगरसेवक तेवढे मतप्रवाह आहेत असे वारंवार सातारकर जनतेला जाणवत आले आहे.विरोधकांना ही आयती संधी असल्याने सत्ताधारी साविआत जे सुरू आहे ते खुप भयानक आहे.विध्यमान नगराध्यक्षा माधवी कदम यांना काहीच माहिती पडू द्यायचे नाही.त्यांची कोंडी करायची असा डाव नियमितपणे सूरु असल्याचं सातारकर पाहतात.त्यामुळे सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीत बिघाडी असल्याचे दिसून येते.साविआ एका जेष्ठ नगरसेवकांच्या दबावामुळे मुख्याधिकारी शंकर गोरे हेही नगराध्यक्षा यांना काहीच माहिती देत नाहीत.एवढेच नाही तर उपनगराध्यक्ष व काही सभापतींना ही माहिती देण्याचे टाळले जाते आहे, असा आरोप होत आहे.सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे.इतर वेळी शासनाच्या काय काय योजना आल्या ते सांगितले जात नसावे पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याची तरी किमान माहिती देणे अपेक्षित होते.मात्र, मुख्याधिकारी शंकर गोरे हे काही सातारा विकास आघाडीतील काहीच नगरसेवकांचे ऐकतात आणि तसा कारभार करतात, असाही आरोप होत आहे.त्यामुळे आपोआपच सातारा विकास आघाडीत दोन ते तीन गट पडल्याचे दिसते.नुकतीच मदत वाटपाची बैठक पार पडली.त्या बैठकीत मुख्याधिकारी गोरे यांनी जे जे नगरसेवकांना सांगितले त्याची अंमलबजावणी गेले दोन दिवस झाली नाही.अगोदरच सातारा विकास आघाडीचे विरोधक नगरविकास आघाडी आणि भाजपचे नगरसेवक कधी नव्हे ते एकत्र आले आहेत.कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी पालिकेत वास्तविक कुरघोडय़ाचे राजकारण न होता एकी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सातारकर जनता विचारू लागली आहे.
राजेंनी त्या नगरसेवकांना दूर ठेवावे
खासदार उदयनराजे यांच्या गटाची पालिकेत सत्ता आहे पण सातारा विकास आघाडी शहराचा विकास साधण्याऐवजी कुरघोडी करून आपलीच डाळ शिजवणारे अनेक नगरसेवक राजेंच्या अगदी जवळचे मानले जातात.त्यांच्याकडून साविआला नेहमीच वरचढ ठरवण्याऐवजी आपलीच कशी पोळी भाजता येईल, आपलाच डाव कसा साधता येईल हे घडत राहिले आहे.त्यामुळे सध्याच्या काळात अशा नगरसेवकांना जरा राजेंनी दूर ठेवावे अशी मागणी होऊ लागली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी हवी एकीची मूठ
किती ही विरोध असला तरीही संकट आल्यावर एकी ही हवीच असते.शत्रूला हरवण्यासाठी महत्वाचे ठरते ते एकी.मात्र, सध्या पालिकेत पदाधिकारी यांच्यात एकी दिसत नाही.त्यामुळे अधिकारी काय करतात ते काही पदाधिकारी यांना कळत ही नाही.कोरोनामुळे किती निर्जंतुक फवारणी केली?,आलेल्या मदत साहित्याचे पुढे काय झाले,असे सर्व प्रश्न बैठक होऊनही प्रलंबित राहिले आहेत.सातारा विकास आघाडीतच एकी व्हावी अशी अपेक्षा होऊ लागली आहे.