राजू गोरे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्या लेखापाल श्रीमती आरती नांगरे यांनी निवड श्रेणी नगर अभियंता यांची बिलांवर सही नसताना 10 ते 15 कोटी रुपयांची अनियमित व चुकीची बिले पास करून आर्थिक घोटाळा केलेला आहे. तसेच बायोमायनिंग प्रकल्पाचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहे, अशा तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजू गोरे यांनी केलेल्या आहेत. तर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या तक्रारींच्या अनुषंगाने म्हणाले की, सर्व कामे नियमानुसार झालेली आहेत. त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. त्यांनी पुरावे द्यावेत. त्यांचे आरोप न्यायालयात सिद्ध करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजू गोरे यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, पालिकेत निवड श्रेणी नगर अभियंता म्हणून भाऊसाहेब पाटील या पदावर गेली 4 वर्षापासून कार्यरत आहेत. ते बांधकाम विभागाचे विभाग प्रमुख आहेत. दिलीप चिद्रे यांची पालिकेत नगर अभियंता श्रेणी अ या पदावर शासनाने बदली केली आहे. पाटील यांची सही न घेताच श्रेणी अ अभियंत्याच्या सहिने निवड श्रेणी नगर अभियंत्यांना बाजूला ठेवून डीएमए ऑफिसच्या ऑर्डरला हरताळ देवून मुख्याधिकारी, श्रेणी अ नगर अभियंता, लेखापाल वित्त विभागातील आधिकाऱयांनी 10 ते 15 कोटीची बिले पास करून मक्तेदार याच्या खात्यात जमा केलेली आहेत. सोबत बॉयोमॉयनिग प्रकल्पाचे निवड श्रेणी नगर अभियंता याच्या सहीने बिल पास केले आहे. या बेकायदेशीर बाबींना लेखापाल यांनी विरोध करणे गरजेचे होते. मात्र त्यानी सह्या केलेल्या आहेत व बेकायदेशीर कामांना मदत केलेली आहे. फक्त ठेकेदार पोसणे आणि घोटाळा करण्यासाठी मुख्याधिकाऱयांनी काढलेली ऑडर बेकायदेशीर आहे, याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी राजू गोरे यांनी केलेली आहे.
त्यांनी कोर्टात जावून सिद्ध करावेः मुख्याधिकारी अभिजीत बापट
बायोमायनिंग प्रकल्पाबाबत रितसर सभागृहात ठराव झालेला आहे. सर्व प्रशासकीय मंजुऱया आहेत. त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत. ज्या बिलांबाबत आरोप केलेला आहे ती बिले केलेल्या कामाचीच काढली आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व बाबी व निकष पाहूनच लेखापाल यांनी सह्या केलेल्या आहेत. त्यांना आम्ही दि. 30 पर्यंत पुरावे मागितले होते. त्यांनी पुरावे देण्याऐवजी तक्रार केली आहे. त्यांच्याकडे पुरावे असले तर त्यांनी कोर्टात केलेले आरोप सिद्ध करावेत. तसा काहीच प्रकार घडला नाही, असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.