ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच मला खोटय़ा प्रकरणांमध्ये अडकविण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जात असून, काही लोक माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपानंतर खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला. मलिकांवर पाळत ठेवण्याइतकं त्यांचं महत्त्व नाही. चार दिवस टिव्हीवर दिसल्याने कोणी मोठे होत नाही, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलिक स्वत:ला फार महत्त्वाचा माणूस समजत आहेत. मात्र, पाळत ठेवण्याइतकं त्यांचं महत्व नाही. चार दिवस टीव्हीवर दिसलं म्हणजे कोणी लोकप्रिय होत नाही. तसेच नवाब मलिकांनी घेतलेली भूमिका ही ड्रग्ज माफियांना नक्कीच फायद्याची ठरली, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.