पुणे / प्रतिनिधी
दक्षिणेकडील भागात कोसळत असलेला मुसळधार पाऊस तसेच महाराष्ट्र- गोव्यातील पावसाची तीव्रता येत्या 24 तासांत ओसरणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून दूर जात आहे. तसेच दक्षिणेकडील कमी दाबाचे क्षेत्रही विरल्याने पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. सोमवारनंतर महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकात पाऊस कमी होईल. सोमवारनंतर तुरळक पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने रविवारी दिली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीवर पोहोचल्याने तामिळनाडू तसेच आंध्र किनारपट्टीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे येथील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा यात बळीही गेला. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने पुढील तीन दिवस दक्षिणेकडील राज्यात तुरळक पावसाचा अंदाज असून यानंतर पावसाचा प्रभाव वाढणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल येथे 24 व 25 नोव्हेंब्हरला मुसळधार पावसाची शक्यता आहे.