शहरातील नालाकाठावरील कॉलनींमधील रहिवाशांची अवस्था : जोराचा पाऊस झाल्यास घरात पाणी शिरण्याची धास्ती कायम
अनंत कंग्राळकर/ बेळगाव
पाऊस आला की शहराच्या मध्यभागी असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह वाढतो. रहिवाशांच्या हृदयाची धडधड वाढण्यास प्रारंभ होऊन झोपच उडते. कारण गेल्या 20 वर्षांहून अधिक कालावधीपासून येथील सांडपाण्याची समस्या संपुष्टात आली नाही. पाऊस आला की घराघरांमध्ये पाणी शिरते. मागील वर्षीदेखील ही समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना कित्येक रात्री जागून काढण्याची वेळ आली. यामुळे या समस्येचे निवारण महापालिका केव्हा करणार? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.
रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. नालेही तुडुंब भरून वाहू लागल्याने नालाकाठावरील कॉलनींमधील रहिवाशांच्या उरात धडकी भरली. शास्त्राrनगर, गुडस्शेड रोड, कोनवाळ गल्ली अशा विविध भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचून राहिले. यामुळे पुन्हा मागील वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या. रात्री पाऊस झाल्यास घरात पाणी शिरेल का? अशी धास्ती निर्माण झाली होती. यामुळे ही धास्ती नाहीशी करण्यासाठी मनपा प्रशासन कायमस्वरुपी उपाययोजना कधी राबविणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
पाऊस आला की नाल्यांचे पाणी विविध कॉलनींमधे घुसून घरातील साहित्य, फर्निचर, दुचाकी, चारचाकी वाहने पाण्याखाली जातात. अशीच परिस्थिती मागील वर्षी झालेल्या पावसामुळे निर्माण झाली होती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे नाल्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले. पण नाल्यांमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याने परिसरातील गटारींद्वारे कोनवाळ गल्ली नाला, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थनगर, म. गांधी कॉलनी, शिवाजी कॉलनी, शांती कॉलनी, नानावाडी, काँग्रेस रोड, जुने बेळगाव, वडगाव बाळकृष्णनगर, शास्त्राrनगर, समर्थनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्लीमध्ये पाणी भरण्यास प्रारंभ झाला. बघता-बघता रस्ते पाण्याखाली गेले आणि घरांमध्ये पाणी घुसले. रस्त्यांवर कंबरभर तर प्रत्येक घरात दीड ते अडीच फूट पाणी भरले. यामुळे नागरिकांना साहित्याची हलवाहलव करण्यासाठी मध्यरात्री धावपळ करावी लागली. पण इतक्यावर संपले नाही, कारण पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणी कमी होण्याचे नाव घेत नव्हते. संततधार कोसळणाऱया पावसामुळे शहरात रस्त्यांवरील आणि विविध कॉलनींमधील पाणी आठ दिवस कमी झाले नाही.
घरात घुसणारे पाणी रोखण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागली. टिळकवाडी, नानावाडी परिसरात, काँग्रेस रोड तसेच गोवावेस येथील खानापूर रोडवरून पाणी वाहू लागल्याने काही तळघरांमध्ये पाणी साचून राहिले होते. यामुळे नागरिकांची विद्युत मीटर जळाल्याने अंधारात दिवस काढावे लागले. रहिवाशांना घरात घुसलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात अनेक दिवस काढण्याची वेळ आली. पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली असता घरातील बिछाने, कपडे, फर्निचर आदी साहित्यासह घरातील कपाटात पाणी घुसून किमती ऐवज आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली. घराबाहेर थांबविलेली वाहने पाण्याखाली गेल्याने वाहने नादुरुस्त झाली. अशा विविध समस्यांचा सामना शहरातील पूरग्रस्तांना करावा लागला. पण ही परिस्थिती आजची असली तरी गेल्या 20 वर्षांपासून या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पावसाचा जोर वाढून नाल्यांचे पाणी कॉलनींमध्ये घुसले की घरांमधील साहित्याचे नुकसान होते. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळेच नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याची टीका रहिवासी करीत आहेत.
प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही नाही
दरवर्षी नाला स्वच्छता करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येते. नाल्यांच्या स्वच्छतेबाबत आणि येथील समस्यांची तक्रार महापालिकेकडे केली जाते. पण प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नाही. नाल्यांची स्वच्छता झाली असती तर कचऱयाचे ढिगारे साचले नसते. नाला स्वच्छतेच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने केवळ नागरिकांची दिशाभूल केली आहे. आजपर्यंत नाला स्वच्छता मोहीम राबवून महापालिकेच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महात्मा गांधी उद्यानकडून जुना धारवाड रोडकडे नाल्याची परिस्थिती पाहता पूर्ण कचरा, मातीचे ढिगारे आणि झाडेझुडुपे वाढली आहेत. यामुळे नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्यानेच सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यास अडचण निर्माण होऊन कपिलेश्वर कॉलनीमध्ये पाणी शिरत आहे. परिसरातील नाल्याची रुंदी बऱयापैकी आहे. पण दोन्ही बाजूने कचरा आणि मातीचे ढिगारे असल्याने फक्त दहा-पंधरा फुटांमधून सांडपाणी वाहते. म. गांधी उद्यानाजवळ दोन नाले मिळत असल्याने नाल्यांमध्ये सांडपाण्याची क्षमता वाढते. पण नाल्यामध्ये कचरा असल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण होऊन परिसरात पाणी घुसते. वास्तविक पाहता दोन नाले मिळत असल्याने सांडपाण्याची क्षमता दुप्पट होते. यामुळे नाल्यामधील कचरा काढून स्वच्छ करण्याची गरज आहे. पण याचा विसर महापालिकेच्या अधिकाऱयांना पडला आहे. यामुळेच पावसाळय़ात सांडपाण्याची समस्या परिसरात निर्माण होत आहे.
शिवाजी उद्यान, कपिलेश्वर कॉलनी, जुना धारवाड रोड, समर्थनगर ते बळ्ळारी नाल्यापर्यंतचा कचरा काढून नाल्याची स्वच्छता करण्याची गरज आहे. सध्या येथील समस्येचे निवारण करण्यासाठी सदर परिसरातील कचरा काढून नाला स्वच्छ केला आहे. पण नाल्यामधून येणारा कचरा समर्थनगर परिसरात साचत असल्याने या ठिकाणी समस्या निर्माण होत आहे. टिळकवाडी, गुडस्शेड रोड, शास्त्राrनगर परिसरातील नाल्याची स्वच्छता यंदा करण्यात आली आहे. पण काही ठिकाणचा कचरा व झाडेझुडुपे हटविण्यात आली नसल्याने त्यामध्ये कचरा साचून सांडपाणी ओव्हरफ्लो होते. दरवर्षी महापालिकेच्यावतीने नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. नाल्यावर असलेले गवत कापून कर्मचारी निघून जातात. मात्र नाल्यामधील गाळ, कचरा तसाच साचून राहतो. यामुळे नाल्याची स्वच्छता म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शास्त्राrनगर परिसरातील मुख्य नाल्याची स्वच्छता ठिकठिकाणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. येथील महालक्ष्मी मंदिर ते शास्त्राrनगर सहावा क्रॉसपर्यंत नाल्याची स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी पावसाळय़ात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन सहावा क्रॉस परिसरात पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या नाल्याची स्वच्छता जोराचा पाऊस होण्यापूर्वी करण्याची गरज आहे.