जिल्हय़ात शेतीच्या कामांत खोळंबा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मान्सून कोकणात सक्रिय झाला पण दमदार सुरूवात करून धुवाँधार बरसणाऱया या पावसाने गेल्या आठवडाभरापासून जिल्हय़ात उसंत घेतली असल्याचे चित्र आहे. दमदार पावसाच्या आगमनाने सुखावलेला शेतकरी आता चांगलाच चिंतेत पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याचे पडणारे ऊन आणि पाऊस नसल्याने शेतीच्या कामांचा मोठा खोळंबा झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.
यावर्षी जूनच्या प्रारंभालाच पावसाचे आगमन झाले. निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात जूनच्या प्रारंभी आठवडाभरातच मान्सून सक्रिय झाला. पावसाच्या दमदार आगमनाने रत्नागिरी जिल्ह्य़ात शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. पावसाच्या आगमनाचा लाभ घेत शेतीच्या पेरण्यांना सुरूवात झाली. त्यानंतर शेतजमिनीची उकल, बेर ही देखील कामे गतीने सुरू झाली. आता तर पेरणी केलेले बियाण्यांची चांगलीच रुजवात झाली. त्यामुळे अधून-मधून बरसणाऱया पावसाच्या दमदार सरींनी भातरोपे आता लावणीयोग्य झाली आहेत.
पावसाच्या या बरसणाऱया सरींचा अंदाज घेत कातळभागातील भातशेती लावणीची कामे हाती घेण्यात आली. पण गेल्या आठवडाभरापासून त्या देखील कामांना पावसाने ब्रेक दिल्याचे चित्र आहे. दमदार पाऊस बरसेल त्यावर शेतीची पुढचे नियोजन केलेले असते. पण आता उकल, बेर नांगरणीची कामे आटपली असताना पावसाची प्रतिक्षा शेतकऱयांना करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे पावसाच्या धर पाण्यावर अवलंबून असलेली शेतीची कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणथळीच्या ठिकाणी पाट किंवा मोटारीच्या पाण्यावर शेत लावणीची कामे शेतकऱयांनी हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी देखील पावसाने याच कालावधीत फिरवली होती पाठ
गतवर्षी 2019 मध्ये देखील याच कालावधीत पावसाने पाठ फिरवलेली होती. मात्र यावर्षीच्या हंगामात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्य़ात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र समोर आलेले आहे. त्यामध्ये जिल्ह्य़ातील पावसाच्या नोंदीकडे पाहिल्यास गेल्या 13 जून रोजी 69.89 मिमि, 14 जून-26.89, 15 जून-30, 16 जून-37.89, 18 जून-112.78 (दमदार), पुन्हा 19 जून-89.67, 20 जून-27.11, 21 जून-4.33, 22 जून-20, 23 जून-12.56, 24 जून-5.78 सरासरी इतक्या पर्जन्यमानाची नोंद जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.