प्रतिनिधी / रत्नागिरी
अमवास्येच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या उधाणामुळे मिर्या किनार्यावर अजस्त्र लाटांचे तडाखे बसत होते. पावसाने उंसत घेतल्याने त्याची तीव्रता काही अंशी कमी झाली. मात्र, लाटांच्या तडाख्याने तेथील धुपप्रतिबंधक बंधारा अधिकच ढासळला आहे. महिनाभराहून अधिक काळ बंधार्यालगत अडकलेले ‘स्टार बसरा’ जहाज लाटांच्या तडाख्यांनी अधिकच गलितगात्र झाले असून ते वाचवण्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी अमवास्येच्या पार्श्वभुमीवर किनारपट्टीवरील नागरिक विशेषत: मिर्यावासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातवरण होते. अमावास्येच्या उधाणाचा मोठा फटका किनार्याला बसण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आठवडाभर धुवाँधार बरसणार्या पावसाने सकाळपासूनच विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उधाणाची तीव्रता काही अंशी कमी झाली.
उधाणाची तीव्रता कमी असली तरी अजस्त्र लाटा किनार्यावर धडकत होत्या. त्यामुळे आधीच खिळखिळा झालेला धुपप्रतिबंधक बंधारा काही पमाणात वाहून गेल्याचे दिसून आले. या दिवशीही अजस्त्र लाटा बंधार्यावर येऊन आदळत होत्या. त्या थेट तेथील नागरिकांच्या बागायतीत जाऊन कोसळत होत्या.
जहाज अधिक क्षतीग्रस्त
चक्रीवादळात भरकटून मिर्या किनार्यावर आलेले भले मोठे जहाज सुमारे दिड महिना झाले तरी तेथेच अडकून पडले आहे. लाटांच्या तडाख्याने जहाज वाळूत रुतले आहे. सोमवारी उधाणाच्या लाटा आदळून जहाज अधिकच क्षतीग्रस्त झाले. मोठ्या लाटा जहाजावरून गेल्यामुळे ते जहाज आणखी किती दिवस तग धरून राहणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
जहाज काढण्याला चार दिवसाचा ‘अल्टीमेटम’
बसरा स्टार एजन्सीचे भरकटुन मिर्या किनाऱयाला लागलेले इंधनवाहू जहाज किनार्यावर अडकून पडले आहे. सोमवारी आमावस्येच्या उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्यांना चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. या कालाधीत त्यांनी जहाज भंगारात काढणे किंवा दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली.