पावसाळी भाजीचे मळे संकटात : शेतीभाती करपण्याची भीती
प्रतिनिधी /पणजी
गेले काही दिवस पावसाने पूर्णतः दडी मारल्याने त्याचा परिणाम आता शेतीवर होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऐन ऑगस्टमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस व काही वेळा उन किंचित पडून पुन्हा पाऊस असा प्रकार चालायचा. त्याऐवजी यंदा ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने ‘ऑगस्ट वणवा’च सुरु झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
राज्यात तापमान वाढले. उष्णतामान वाढल्याने उकाडा असह्य होऊ लागला आहे. एव्हाना ऑगस्टमध्ये कैकवेळा मुसळधार पाऊस पडायचा. यावर्षी जुलै अखेरीस राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र जलप्रलय आल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.
छोटय़ा शेतकऱयांचे हाल
सध्या पाऊस पूर्णतः थांबलेलाच आहे. यामुळे भात शेती आता करपणार की काय? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. सध्या ‘भेंडी, काकडी, भोपळा, कारली व इतर फळभाज्यांचे उत्पादन घेणाऱया छोटय़ा शेतकऱयांचे हाल झाले आहेत. गेले 15 दिवस पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.
पावसाळी भाजीचे मळे संकटात
डोंगरावरील उतरणीवर दोडगी, काकडी, भेंडी, चिबुड, पडवळ, घोसाळी, कारली इत्यादींचे उत्पादन घेऊन वार्षिक आपली गुजराण करणारा शेतकरी विशेषतः महिला शेतकऱयांना पिकासाठी पाणी मिळणे कमी झाल्याने झाडाना किडीच्या प्रादुर्भावाने उत्पादनावर परिणाम केलेला आहे. त्याचबरोबर काही झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. त्यामुळे फळ भाज्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.
शेतीभाती करपून जाण्याची भीती
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून एकदमच कमकुवत झालेला आहे. आगामी पाच दिवसांत किंचित पावसाचा शिडकावा होऊन जाईल, असे म्हटले आहे. पुढील 5 दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतीभाती करपून जाण्याची शक्यता वाढली आहे.