प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. परतीच्या पावसामुळे भातपिकासह इतर पिकांनाही पोषक वातावरण मिळाले तर काही पिकांना याचा फटकाही बसला आहे. मात्र आता भातपीक बहरू लागले असून आणखी काही दिवसांत कापणीलाही सुरुवात होणार आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इतर कामे उरकण्यात शेतकरी गुंतला आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतामधील पिके सुकून जात होती. त्यामुळे सर्वांनाच चांगल्या पावसाची नितांत गरज होती. परतीच्या पावसाने सर्वत्रच समाधानकारक सलामी दिली. त्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र सोयाबीन, बटाटा पिकांना हा पाऊस मारक ठरला तर येळ्ळूर परिसरात असलेल्या काही भात पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मात्र आता मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेलत्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यामध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे नदी-नाल्यांमध्ये काही प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला होता. कंग्राळी खर्दू मार्कंडेय नदीचा जुना पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्मयता होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने ही समस्या मिटली आहे. नाही तर नदीकाठ परिसरात असणाऱया भातपिकांना पुन्हा फटका बसला असता.
सध्या बटाटा, सोयबीन या पिकांना फटका बसला आहे. बाजरी, मका, जोंधळा तसेच इतर पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. यावर्षी पावसाने बऱयापैकी साथ दिली आहे. आता भाताची पोसवणी होत असून शेतकरी सुखावला आहे. आणखी काही दिवस पावसाने विश्रांती घ्यावी, अशीच मागणी होत आहे.