मौसिनराम, चेरापुंजीत देशात सर्वाधिक पाऊस, एका हंगामात 11 हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. भारताबरोबर चीन, जर्मनीसह युरोपमधील अनेक देशांनाही दणकेबाज पावसाचा फटका बसला आहे. जागतिक तापमान वाढत आहे, तशी पावसाच्या प्रमाणातही वाढ होत जाईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पाऊस मोठय़ा प्रमाणात होत असला तरी त्याची अनियमितताही वाढत आहे, ही महत्वाची अडचण माणसाला सोसावी लागणार असेही दिसून आले आहे. त्यामुळे कुठे महापूर, कुठे ढगफुटी, तर कुठे अवर्षण यापुढे अनुभवाला येईल, असेही सांगितले जाते. भारतात ईशान्य भारतात मान्सूनचा पाऊस सर्वाधिक पडतो. त्या खालोखाल तो केरळ आणि पश्चिम सागरतटीय प्रदेशात पडतो. मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजी ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे आहेत. त्या तुलनेत भारताच्या मध्य भागात कमी पर्जन्यवृष्टी होते. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणा राज्याचा मध्यभाग येथे अनेकदा दुष्काळी परिस्थिती असते. त्याचप्रमाणे तामिळनाडूत वर्षात दोनदा पावसाळा असतो. म्हणजे तेथे काही भागांमध्ये ऑक्टोबरमध्येही पाऊस पडतो. अशा प्रकारे भारताचा जीवनदाता पाऊस हा विविध प्रकारे आपल्याला दरवर्षी भेटत असतो.
मेघालय म्हणजे ढगांचे आगार
भारताच्या ईशान्य भागात वसलेल्या मेघालयाच्या नैसर्गिक सौंदर्याची अन्य कोणत्याही भागाशी तुलना होऊ शकत नाही. येथील पर्वत, धबधबे सौंदर्यात जितकी भर घालतात तितकाच येथील पाऊसही प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात आर्द्र ठिकाण मौसिनराम हे मेघालयमध्येच असून जगात सर्वाधिक पाऊस येथे पडतो. येथे वार्षिक सरासरी पाऊस 11,872 मिमी (467.4 इंच) आहे. हा पाऊस भारताच्या 1,083 मिमी या राष्ट्रीय सरासरीपेक्षा 10 पट अधिक आहे. या भागात वसलेल्या चेरापुंजीच्या नावावर विक्रमी पावसाचा विक्रम होता. या भागालाच सोहरा म्हणूनही ओळखले जाते. एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडल्याबद्दल चेरापुंजीचे नाव अद्याप गिनिज बुकमध्ये नोंद आहे. जुलै 1861 मध्ये येथे 9,300 मिमी किंवा 366 इंच पावसाची नोंद झाली. तसेच 1 ऑगस्ट 1860 ते 31 जुलै 1861 पर्यंत 26,461 मिमी पाऊस पडल्याचा विक्रमही घडला आहे. चेरापुंजी येथे सरासरी वार्षिक 11,777 मिमी पाऊस पडतो. सोहरा (चेरापुंजी) हे शहर खासी टेकडय़ांवर असून जगातील सर्वात जास्त पाऊस येथे होतो. हा पाऊस केवळ पावसाळय़ातच नसतो तर येथे रोजच पाऊस असतो. ब्रह्मपुत्रा, कोपीली, मायनटडू, पियाइन, सोमेश्वरी या नद्या मेघालयातून वाहतात. तर खासी, गारो, जयतियारांगा हे पर्वत पाहायला मिळतात. आता मौसिनराम येथे चेरापुंजीपेक्षा अधिक म्हणजे 11,872 मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे ते सर्वोच्च पावसाचे ठिकाण ठरले आहे.
पाऊस एक, रुपे अनेक
मुसळधार पर्जन्यवृष्टी पावसावर प्रेम करणाऱया लोकांसाठी ‘नंदनवन’ ठरू शकते, परंतु यामुळे स्थानिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. डोंगराळ भागात आयुष्य जगणे कठीण असतानाच अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळणे, भूकंप अशा घटनांमुळे तेथे राहणाऱया लोकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. काही भागात अतिपावसामुळे शेती करणेही अवघड होते. इथले रस्तेही फार लवकर खराब होतात. तसेच पूल जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून स्थानिक लोक बांबूच्या फांद्या एकत्र बांधून पूल बांधतात.
पूर्वेतील स्कॉटलंड
मेघालयचा संस्कृत अर्थ मेघाच्छादित प्रदेश असा होतो. शिलाँग ही राज्याची राजधानी असून ‘पूर्वेतील स्कॉटलंड’ अशी त्याची ओळख आहे. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. पण 1972 मध्ये खासी, गारो आणि जैंटिया टेकडय़ा मिळून या तीन जिल्हय़ांना स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. आता राज्यात सात जिल्हे आहेत. मेघालयच्या उत्तर-पूर्व ?सीमेला आसाम आणि दक्षिणöपश्चिम सीमेला बांग्लादेश आहे. मेघालयात मेघांचे निवासस्थान (मेघ अधिक आलय) असल्यामुळे मेघालय असे नाव देण्यात आले आहे.
कृषीसंपन्न राज्य
मेघालय हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील 75 टक्क्यांहून अधिक लोक उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. कृषीपोषक हवामानामुळे हे राज्य
प्रगतीपथावर आहे. उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण वातावरणामुळे फळे व भाज्यांबरोबरच भात उत्पादनही उत्तम होते. भुईमूग, सोयाबिन, सूर्यफूल यांचे उत्पादनही राज्यात होते. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने मेघालय कृषीसंपन्न बनलेले दिसते.
चर्चेतील पर्जन्यधारा…
@ सर्वाधिक पावसासाठी मेघालयमधील मासिनराम हे ठिकाण प्रसिद्ध आहे. परंतु 24 तासात सर्वाधिक पाऊस पडण्याची नोंद रियुनियनमधील प्रेंच बेट फॉक-फॉकच्या नावावर आहे. येथे 8 जानेवारी 1966 रोजी 1,825 मिमी पाऊस कोसळला होता. डेनिस चक्रीवादळामुळे हा पाऊस बरसला होता.
@ वायव्य कोलंबियामधील लाइओरो शहरात 1952 ते 1954 दरम्यान वार्षिक 13,473 मिमी इतका पाऊस पडला. हा पाऊस मासिनरामपेक्षा जास्त आहे. परंतु त्यावेळी पाऊस मापण्यासाठी वापरली जाणारी साधने वैध मानण्यात येत नव्हती.
@ महानगरातील शहरांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 2,300 मिमीपेक्षा अधिक असून येथे दरवषी पावसाने अक्राळ-विक्राळ रुप धारण केल्याचे दिसून येते. याचदरम्यान इमारती कोसळण्याच्याही घटना घडत असतात.
@ सिंगापूरमध्ये वार्षिक सरासरी 2,300 मिमीपेक्षा जास्त आहे. फिलीपाईन्सची राजधानी मनिलाची सरासरी 2,047 मिमी आहे. तर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दरवषी 1,855 मिमी सरासरी पाऊस कोसळतो.
@ आफ्रिकन देश लाइबेरियाची राजधानी असलेल्या मोनरोव्हियाची ओळख ‘अतिवृष्टी होणारी राजधानी’ अशी बनलेली आहे. येथे वार्षिक सरासरी पाऊस 179 इंच आहे. केवळ जुलैमध्ये येथे 996 मिमी पाऊस पडतो.
@ दक्षिण अमेरिकेच्या क्विब्दो भागातही सर्वाधिक पाऊस पडतो. येथे दरवषी 7,328 मिमीपर्यंत पाऊस पडतो. येथील लोकसंख्या सुमारे 1.25 लाख असून लोक पिण्याच्या पाण्यासाठीही पावसावर अवलंबून आहेत. येथे बारमाही पावसाची नोंद झालेली आढळते.
@ बौद्ध धर्माच्या चार पवित्र पर्वतांपैकी एक मानला जाणाऱया चीनमधील इमेई येथेही सर्वाधिक पाऊस पडतो. येथे वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण जवळपास 8,169 मिमी इतके आहे.
मान्सूनचे वारे आणि पाऊस
पावसालाच आपण मान्सून असे संबोधतो. तथापि, मान्सून हे पावसाचे नाव नसून ते पावसाचे ढग घेऊन येणाऱया वाऱयाचे नाव आहे. हे वारे साधारणतः मे महिन्याच्या मध्यात दिशा बदलतात आणि भारताकडे येऊ लागतात. प्रथम ते भारताच्या दक्षिण आणि ईशान्य भागात पोहचतात. नंतर हळूहळू जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतभरात विस्तारतात. आफ्रिका किंवा अरबस्तानातील वाळवंटी प्रदेश वगळता जगातील जवळपास प्रत्येक देशात मान्सूनचे वारे येतातच. पण
प्रत्येक देशात ते पावसाचे ढग घेऊन येत नाहीत. त्यामुळे तेथे ते कोरडे वारेच असतात. भारतात किंवा दक्षिण आशियाच्या अनेक देशांमध्ये ते आपल्याबरोबर पावसाचे काळे ढग घेऊन येतात. ते ढग भूमीवर बसरतात. परिणामी आपली पाण्याची आवश्यकता त्या वर्षापुरती भागते. म्हणून मान्सून म्हणजेच पाऊस हे समीकरण आपल्या सर्वांच्या मनात पक्के बसलेले असते.
मान्सूनच्या पावसाची ‘यंत्रणा’
आजवर पावसावर मोठे संशोधन झालेले असले तरी मान्सूनचा पाऊस नेमका का आणि कसा पडतो? तसेच काहीवेळा तो का पडत नाही, किंवा पडला तरी आपल्याला हवा तेवढा का पडत नाही, किंवा काहीवेळा तो अतिप्रचंड प्रमाणात का पडतो, या प्रश्नांची नेमकी उत्तरे कोणालाही सापडलेली नाहीत. मान्सूनची ‘ईश्वरनिर्मित’ यंत्रणा ही आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलिकडची आहे. दरवर्षी भारतात सरासरी साधारणतः 1.2 मीटर उंचीचा पाऊस पडतो. (साधारणतः चाळीस इंच). म्हणजे जलदेवता दरवर्षी भारतात 3.25 लाख कोटी घनमीटरच्या वर पाणी बरसते. सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापणे, त्याची वाफ होऊन आकाशात जाणे, त्या वाफेचे ढग बनणे, वाऱयासमवेत ते ढग भूमीवर येणे आणि ढगांचे परत पाण्यात रुपांतर होऊन ते भूमीवर पर्जन्यधारांच्या रुपाने कोसळणे हे निसर्गचक्र कित्येक कोटी वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. असा पाऊस कृत्रिमरित्या पाडायचा झाल्यास एका मान्सूनसाठी पृथ्वीवरील सर्व ऊर्जा उपयोगात आणावी लागेल. तरीही हे शक्य होईल, असे म्हणता येत नाही. अशी ही जगड्व्याळ यंत्रणा आपल्याला विनामूल्य मिळाली आहे. तिचे महत्व आपण ओळखायला हवे.
मान्सूनचा पाऊस कोठे पडतो ?
वारे केव्हाही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. याचा अर्थ असा की उष्णतेमुळे ज्या भागातील वायू विरळ झालेला असतो, तेथे वारे वाहतात. वाहताना ते जून ते सप्टेंबर या काळात आपल्याबरोबर पावसाचे ढग घेऊन येतात. म्हणूनच आपल्याला असा अनुभव येतो की, जेव्हा प्रचंड उष्मा जाणवतो, त्यानंतर लगेच पावसाला प्रारंभ होतो. तापमानाचा समतोल साधण्यासाठीची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. काहीवेळा पावसाचे दिवस असूनही पाऊस पडतच नाही. याला ‘पावसाने ओढ दिली’ असे म्हणतात. याचे शास्त्रीय कारण असे आहे की कित्येकदा अधिक पावसाच्या भागातही ऐन पावसाळय़ात कमी दाबाचा पट्टा काही अन्य कारणामुळे निर्माण होत नाही. चक्रीवादळे असे पट्टा लवकर निर्माण न होण्याचे एक कारण आहे. त्यामुळे पावसाळय़ाच्या दिवसात सागरी चक्रीवादळे होऊन ती भूमीवर आदळल्यास पावसाचे गणित कोलमडू शकते. पण हा नियमही सदासर्वकाळचा आहे, असे नव्हे. त्यामुळे जेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तेथे पाऊस होण्याची शक्यता जास्त असते एवढेच म्हणता येते. पाऊस होणार की नाही? वेळेवर होणार की नाही? झाला तर पुरेसा होणार की नाही, या सर्व बाबी अनेक नैसर्गिक घडामोडींवर अवलंबून असल्याने हवामान विभागाची अनुमानेही कधीकधी चुकताना दिसतात. मात्र, मागील काही वर्षांचा विचार करता हवामान विभागाचे अंदाजही तंतोतंत जुळल्यामुळे लोकांना आणि प्रशासनाला सावधानता बाळगण्यास मोठी मदत होताना दिसते.
– संकलन- जयनारायण गवस, बेळगाव