प्रतिनिधी/ सातारा
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे आगमन पुन्हा जिल्हय़ात सर्वत्र होत आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तर सातारा शहरात पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या त्यामुळे गणेशोत्ववानिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच दैना उडाली होती. पावसापासुन बचाव करण्याकरीता बाजारपेठेत मिळेलत्या ठिकाणी आसरा घेण्यात येत होता.
तसेच सध्या सणाचे औचित्य साधुन अनेक लहान-सहान फेरीवाले, फुटपाथ वरील विक्रेते शहराच्या मुख्य बाजारपेठेत दाखल आहेत. अवकाळी येणाऱया पावसामुळे मात्र या विक्रेत्यांची ही चांगलीच तारांबळ उडाली. सोमवारी सकाळ पासुन कडक उन होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास ढकाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात येतच होती.
या पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच खुष झाला आहे. कारण कारण मागील महिन्याभरापासुन पावसाने दडी मारली होती. त्यामुळे नुकतेच पेरणी करण्यात आलेली पिके पावसाअभावी वाया जाण्याची भिती होती. पात्र मागील दोन दिवसांपासुन वातावरणात झालेला बदल आणि काही प्रमाणात का होईना पावसाचे होत असलेल्या आगमानामुळे या पिकांना नवसंजिवनी मिळाली आहे.